New Mumbai : ‘‘भगवंत सर्वांच्या हृदयात असतो. त्याची जाणीव होण्यासाठी विश्वास हवा. पंचेंद्रिय ज्याला स्पर्श करू शकत नाहीत, तो विश्वास असतो. तोच विश्वास गुरूवर हवा, तरच भगवंताची बासरीसुद्धा ऐकू येईल. त्यासाठी श्रद्धा व सबुरी हवी,’’ असा मंत्र आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी बुधवारी दिला.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’अंतर्गत आयोजित ‘श्रीगुरू पादुकादर्शन’ उत्सवात श्री एम यांनी भाविकांना ‘विश्वासा’चे महत्त्व कथेच्या माध्यमातून उलगडून सांगितले. ते म्हणाले, ‘‘दारिद्र्यात जीवन जगणारी आई मुलाला शिक्षण मिळावे, यासाठी गुरूंकडे घेऊन गेली. पण, तो रस्ता घनदाट जंगलातील होता.
मुलाला भीती वाटायची. ती घालवण्यासाठी जंगलात राहणाऱ्या मुलाला ‘आवाज देत जा. तो तुला मदत करेल. त्याच्या डोक्यावर मोरपीस आहे. हातात बासरी आहे. त्याचा रंग सावळा आहे,’ असे आईने सुचवले. त्याप्रमाणे तिचा मुलगा वागत होता. रोज तो लहान मुलगा जंगलात त्याच्या मदतीला धावून येत होता.
एकदा गुरुदक्षिणेसाठी आईने मुलासोबत कमंडलूतून दूध पाठवले. ते सर्व भांड्यांमध्ये ओतले तरी संपत नव्हते. तेव्हा जंगलातील मुलाबाबत गुरूंना कळाले. सर्व जण जंगलात गेले. आवाज देऊनही मुलगा आला नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, ‘तू आला नाही तर, माझ्यावरचा गुरूंचा विश्वास उडेल.
त्या वेळी दूरवरून आवाज आला, की तुझा माझ्यावर विश्वास असल्यानेच मी तुझ्या मदतीला रोज यायचो. पण तुझ्या बरोबर आलेल्यांचा माझ्यावर विश्वास नाही, त्यामुळे मी आता येत नाही.’ हा आवाज म्हणजेच भगवंतावरील विश्वास होता. तो मनात असेल तर सर्व मिळेल.
कथांमधून भगवंत समजणे सोपे
‘‘महर्षी व्यास यांनी वेद लिहिले. महाभारत लिहिले. ब्रह्मसूत्र लिहिले. ब्रह्मसूत्र समजणे सोडाच, ते वाचणेही फार अवघड आहे. एके दिवशी नारदमुनींनी व्यासांना विचारले, ‘‘एवढे सर्व काही लिहूनही तुमच्या चेहऱ्यावर समाधान का दिसत नाही. कारण काय?’’ यावर व्यासमुनी म्हणाले, ‘तुम्हीच सांगा.’
तेव्हा नारदमुनी म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व काही लिहिलं पण देवाच्या लीलांबद्दल काहीच लिहिलं नाही.’ हे ऐकल्यानंतर व्यासमुनींनी श्रीमद्भागवत लिहिलं. अवघड अशा ब्रह्मसूत्राचे सार श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये आहे. भगवंताच्या सर्व अवतारांच्या कथा त्यात आहेत. त्या वाचल्या किंवा ऐकल्यानंतर आपण प्रभावित होतो. त्यातून भगवंत समजणे सोपे जाते,’’ असेही आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी सांगितले.
‘मेरा’ बंद, ‘तेरा’ शुरू
गुरुनानक गुरू बनण्यापूर्वी एका नवाबाकडे कामाला होते. मोजून वस्तू द्यायची, अशी जबाबदारी त्यांच्याकडे होती. पण, कामाच्या पहिल्याच दिवशी वस्तू मोजून देताना ते तेरा आकड्यांपर्यंतच मोजू शकले.
तेरा, तेरा, तेरा, म्हणत वस्तू देऊ लागले. कुणी तरी नवाबाला हा प्रकार सांगितला. नवाबांनी तिथे येऊन विचारलं, ‘हे काय चाललंय?’ यावर गुरुनानक म्हणाले, “सगळं काही देवाचं आहे. आपलं काही नाही. जेव्हा ‘मेरा’ बंद होणार तेव्हा ‘तेरा’ शुरू होणार. देण्यात जो आनंद आहे, तोच परमानंद आहे,’’ या कथेतून श्री एम यांनी समर्पण भावनेचे महत्त्व विशद केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.