
Yavatmal News : राज्याचे, केंद्राचे पॅकेज, बळीराजा चेतना अभियान यासह इतर अनेक उपक्रम शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी राबविण्यात आले. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्यांचे संत्र थांबत नसून गेल्या वर्षभरात तब्बल २९० शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हयात झाली.
शेतमालाला मिळणारा कमी भाव, मॉन्सूनच्या पावसावर येणारी जेमतेम उत्पादकता या व अशा अनेक कारणांमुळे शेतीसमोरील आव्हाने आणि परिणामी शेतकरी आत्महत्यांमध्येही वाढ झाली.
वाढत्या आत्महत्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून पॅकेजची अंमलबजावणी करण्यात आली.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्याचे जाहीर केले. कोट्यवधी रुपयांची तरतूद या अभियानासाठी करण्यात आली.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर योजनाही बंद झाली. आता या विभागात कुणीही उरले नाही. योजना कुचकामी ठरल्याच्या परिणामीच गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २९० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली.
यातील १५३ आत्महत्या मदतीला पात्र तर १२७ अपात्र ठरल्या. दहा आत्महत्या चौकशीत आहेत. २०२२ या वर्षात ऑगस्ट, आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सर्वाधीक आत्महत्यांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात ४३ तर सप्टेंबर महिन्यात ३२ आत्महत्या झाल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा विचार केल्यास राळेगाव तालुक्यात २०२२ या वर्षात सर्वाधीक २९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. यवतमाळ तालुक्यात २८ आत्महत्या झाल्या.
असे आहेत निकष...
शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरवितांना निकष आहेत. त्यामध्ये सलग तीन वर्ष नापिकी असावी, थकीत कर्ज असेल तर कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला असे स्पष्ट करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
या निकषांची पुर्तता करणे कठीण होत असल्याने अनेक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.