Agriculture Intercropping Method : आंतरपीक पद्धतीवर द्या भर

Agriculture Method : अद्याप अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलिमीटर) वाट पाहावी. पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पेरणी करावी.
Intercropping Method
Intercropping MethodAgriculture
Published on
Updated on

डॉ. आनंद गोरे, मंगेश राऊत

Indian Agriculture : अद्याप अनेक ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने घाबरून न जाता पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलिमीटर) वाट पाहावी. पिकासाठी दिलेल्या कालावधीनुसार पेरणी करावी.

पावसास उशीर झाल्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या नियोजनाप्रमाणे पिकांची निवड करावी. सर्वसाधारण परिस्थिती तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत मूग, उडीद, भुईमूग सोडून सर्व पिकांची पेरणी करता येते. अद्याप ही वेळ गेलेली नाही.

मूग, उडीद व भुईमूग पिकांची पेरणी ७ जुलैपर्यंत करणे अपेक्षित आहे. परंतु पाऊस उशिरा सुरू झाल्यास मूग, उडीद व भुईमूग या पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करण्याची जोखीम घेता येऊ शकते. उशिरा पेरणीमुळे उत्पादनात होणारी घट आणि काढणीच्या वेळी पीक पावसात सापडण्याची शक्यता लक्षात घेणे गरजेचे आहे.

१६ जुलैनंतर सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळा आणि तीळ अशा पिकांची लागवड करावी. सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळा आणि तीळ या पिकाबरोबरच सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा लागेल. तर संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशी ही पिके घेवू नयेत.

Intercropping Method
Fertilizing Crop Method : पिकांना खत देण्याच्या विविध पद्धती

बऱ्याच वेळा पाऊस उशिरा सुरु होत असून उशिरा संपत असल्यामुळे सोयाबीन आणि कापूस लागवड १५ जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पीक ३१ जुलैपर्यंत आंतरपीक पद्धतीमध्ये घ्यावे उदा. सोयाबीन + तूर (४:२).

पावसाचे आगमन १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस ऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, तीळ लागवड करावी. या पिकांबरोबरच एरंडी + धने (१:१), एरंडी + तूर या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस लागवड करू नये.

पावसाचे आगमन १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाल्यास संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन आणि कापूस, रागी, तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, धने लागवड करावी. एरंडी + धने (१:१), एरंडी + तूर या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ या पिकांची लागवड करू नये.

ज्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस उशिरा सुरू होऊन त्याचे उशिरा निर्गमन होते अशावेळी उशिरा पेरणीमुळे काही पिकांच्या उत्पादनात घट येते. काही नियमित पिकांची लागवड पाऊस उशिरा सुरू झाला तरी करता येऊ शकते. उशिरा पेरणीमुळे उत्पादनात येणारी घट आणि मूग, उडीद सारख्या पिकांची काढणी (सप्टेंबरच्या) पावसात सापडण्याची शक्यता असते.

Intercropping Method
Intercropping Method : आंतरपिकांना बहर

महत्त्वाचे मुद्दे :

सोयाबीन + तूर (४:२) या आंतर पीक पध्दतीचा अवलंब करावा.

सोयाबीन पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी.

कापसामध्ये तूर (६:१ किंवा १०:२), सोयाबीन (१:१), मूग (१:१) किंवा उडीद (१:१)याप्रमाणे आंतरपीक घ्यावीत.

तुरीच्या शिफारशीत जातींची निवडकरून योग्य अंतरावर लागवड करावी.

भारी जमीन, एक ते दोन सिंचन असल्यास तुरीच्या बीएसएमआर ७३६, गोदावरी, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७१६ या वाणांची निवड करावी. बीडीएन ७११ हे वाण कमी कालावधीचे असून त्यांचा वापर कोरडवाहू क्षेत्रासाठी करावा.

मध्यम ते भारी जमिनीत कापसासोबतच तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन लागवड करावी.

मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी लागवड करावी.

हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळा, एरंडी, सारखी पिके घ्यावीत.

मशागत आणि पेरणी उताराला आडवी करावी, जेणेकरून पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल, त्याचा पिकांना लाभ होईल.

प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे. प्रमाणित बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते. परंतु यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता (कमीत कमी ७० टक्के असावी) तपासावी. बीज प्रक्रिया करावी.

पेरणी करताना योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरणी करावी. सोयाबीन पेरणी ४ ते ५ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये. हेक्टरी योग्य बियाणे वापरावे. हेक्टरी योग्य रोपांची संख्या ठेवावी.

वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे. जेणेकरून अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही.

रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रिय खताचा वापर करावा, जेणेकरून जमिनीचे जैविक, भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होईल. आवश्यक जिवाणूंची संख्या आणि सेंद्रिय कर्ब वाढेल.

डॉ.आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com