
Dairy Farming Management :
शेतकरी नियोजन : गोपालन
शेतकरी : दीपक गोकूळ कांबळे
गाव : तीळापूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
एकूण गाई : १७ गाई व ३० कालवडी.
एकूण शेती : पाच एकर
राहुरी तालुक्यातील तीळापूर, येथील दीपक कांबळे यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायात प्रगती साधली आहे. गाईंच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करत बंदिस्त गोठ्यातून मुक्त संचार गोठ्यात गाईंचे संगोपन करत व्यवसाय फायदेशीर केला आहे. पशुपालनामध्ये काटेकोर व्यवस्थापनातून विशेष प्राधान्य दिले जाते.
सध्या त्यांच्याकडे १७ संकरित गाई, ३० कालवडी आहेत. सध्या प्रतिदिन सुमारे १५० लिटरपर्यंत दूध संकलन गोठ्यातून केले जात आहे. घरच्या पाच एकर शेतीपैकी तीन एकरावर चारा लागवड, तर उर्वरित क्षेत्रावर हंगामी पिके घेतली जातात. गाईंना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुग्ध व्यवसायात दीपक यांना वडील गोकुळ, आई केशरबाई, पत्नी रोहिणी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मदत मिळते.
व्यवस्थापनातील बाबी
गोठ्यातील दैनंदिन कामांना सकाळी साडेपाच वाजता सुरवात होते. दूध काढणीसाठी मुक्त गोठ्यातून गाई दावणीला आणून बांधल्या जातात. मिल्किग मशीनच्या साह्याने दूध काढणी केली जाते. दूध काढणी पूर्ण झाल्यावर गाईंना चारा व खुराक दिला जातो.
एका गाईला सकाळी साधारणपणे १२ ते १५ किलोपर्यंत चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, ऊस, मका आणि मुरघास यांची कुट्टी करून दिली जाते.
मुक्तसंचार गोठ्यात गाईंना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी हौदाची व्यवस्था केलेली आहे.
दुभत्या गाईंना दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने गोळीपेंडची समावेश असतो. तसेच प्रथिनयुक्त, कॅल्शिअमयुक्त खाद्य, खनिज मिश्रण दिले जाते.
सकाळप्रमाणेच संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी, चारा व अन्य कामे नियमितपणे केली जातात. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.
आरोग्य व्यवस्थापन
गोठ्यातील गाईंच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. गाईंचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खाद्य आणि गोठा स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. गोठ्यातील गाईंची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते.
लम्पी त्वचा आजार, लाळ्या खुरकूत या आजारांचे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. मागील दोन महिन्यापूर्वी लाळ्या-खुरकुताचे लसीकरण केले आहे.
स्थानिक सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे गोठ्यात येऊन गाईंच्या आरोग्याची तपासणी करतात. आवश्यकतेनुसार औषधोपचार केले जातात.
गाई व कालवडींना दर तीन महिन्यातून एकदा जंताच्या मात्रा दिल्या जातात.
गोठ्यात गोचीड निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या जातात.
मुरघास निर्मिती
चारा टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी मुरघास निर्मिती केली जाते. त्यासाठी शेतात मक्याच्या सुधारित वाणांची लागवड केली जाते. त्यापासून सुमारे ३० ते ४० टन मुरघास निर्मिती केली जाते. त्यामुळे गाईंना टंचाईच्या काळात दर्जेदार खाद्य उपलब्ध होते. मुरघासामुळे टंचाईच्या चारा टंचाईवर मात करणे शक्य होत असल्याचे दीपक कांबळे सांगतात.
शेणखत विक्री
गोठ्यातून दरवर्षी सुमारे २० ते २२ ट्राॅली शेणखत उपलब्ध होते. त्यातील बहुतांश शेणखताचा वापर स्वतःच्या शेतीमध्ये केला जातो. उर्वरित शेणखताची विक्री केली जाते. त्यास चांगले दर मिळतात. आवश्यकतेनुसार गोठ्यातून शेणाची उचल केली जाते. मुक्त गोठ्यातील शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून फळबागांसाठी खताला मागणी अधिक असते. शेणखताच्या वापरामुळे घरची शेती सुपीक होण्यास मदत झाली आहे. त्यातून दर्जेदार चारा पिकांसह हंगामी पिकांचे उत्पादन मिळत असल्याचे दीपक कांबळे सांगतात.
वासरांची विशेष काळजी
नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. वासरू जन्मल्यानंतर गाईला थेट न पाजता वेगळे दूध पाजले जाते. पहिल्या महिन्यात प्रतिदिन सहा लिटर, दुसऱ्या महिन्यानंतर चार लिटर, तर तिसऱ्या महिन्यात दररोज तीन लिटर दूध वासराला पाजले जाते. त्यानंतर हळूहळू दूध पिण्याची सवय कमी करून खाद्य खाण्याची सवय लावली जाते. गरजेनुसार खाद्य, आहार दिला जातो. लहान वासरांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे वासरे, कालवडीच्या वाढीस चालना मिळते. असा कांबळे कुटूंबाचा अनुभव आहे.
दीपक कांबळे, ८३२९९२३८९१
(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.