
Farmer Management :
शेतकरी नियोजन
पीक : नारळ, सुपारी
शेतकरी : विश्वास देसाई
गाव : कळणे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
नारळ, सुपारी लागवड : २.५ एकर
कळणे (ता. दोडामार्ग) येथे विश्वास देसाई यांची अडीच एकरमध्ये नारळ आणि सुपारीची लागवड आहे. नारळाच्या प्रताप आणि टीडी जातीची ३८, तर सुपारीची ३४० झाडे आहेत. याशिवाय फणस, चिकू, लिंबू आदींची लागवड देखील केलेली आहे. नारळामध्ये लागवड आहे. सध्या बागेतील तण काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मागील कामकाज
८ ते १० जून या कालावधीत प्रत्येक नारळाभोवती चर खोदून प्रतिझाड पाच किलो शेणखत आणि दोन किलो रासायनिक खत दिले. सुपारीला प्रतिझाड दोन ते तीन किलो शेणखत आणि दीड किलो रासायनिक खतमात्रा दिली.
जुलै महिन्यात भात शेतीसह अन्य कामे सुरू असतात. या महिन्यात पावसाचे प्रमाणही चांगले होते. त्यामुळे या कालावधीत बागेत अन्य कामे करणे शक्य झाले नाही. फक्त एक दोन दिवसाआड बागेत पडलेले नारळ जमा करणे एवढेच काम केले. याशिवाय सुपारीची पेंढी पडलेली असल्यास ती एकत्र सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते.
सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ग्रासकटरने तण कापून घेतले. यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात देखील पाऊस होता. त्यामुळे पुन्हा काही प्रमाणात तण आले होते. ते देखील ग्रासकटरने काढले. बागेत तणनाशकांचा वापर केला जात नाही. ग्रासकटरने तण कापण्यावर भर दिला जातो.
आगामी नियोजन
या वर्षी अतिमुसळधार पावसामुळे सुपारी पिकांमध्ये फळगळ अधिक झाली. तसेच अर्ध परिपक्व झालेली सुपारी देखील गळून पडली. गळून पडलेली सर्व सुपारी एकत्र करून ती वाळविण्यासाठी ठेवण्यात आली. सध्या बागेतील संपूर्ण तण काढण्याचे तसेच बागेत पडलेला पालापाचोळा गोळा करून तो झाडांच्या बुंध्यावर रचून ठेवण्याचे काम सुरू आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत नारळाच्या सुकलेल्या फांद्या, शेंड्यातील साफसफाई करून त्यामध्ये शिफारशीत रासायनिक कीटकनाशक फवारणी करणार आहे. जेणेकरून भुंग्याचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्यासाठी झाडांची चांगली स्वच्छता करून नंतर रासायनिक कीटकनाशक फवारले जाते. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असा त्यांचा अनुभव आहे.
डिसेंबरमध्ये थंडी चांगलीच वाढते. नारळ बागेत पाटपाणी पद्धतीने दर चार ते पाच दिवसांनी पाण्याचे नियोजन केले जाते. तापमान वाढेल तसे २ पाळ्यांतील अंतर कमी केले जाते. फेब्रुवारी महिन्यापासून मे अखेरीपर्यंत बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बाष्पीभवन रोखण्यासाठी बुंध्यात पालापाचोळ्याचे आच्छादन केले जाते. पाण्याच्या पाळ्यांमध्ये देखील वाढ केली जाते. या कालावधीत बागेत पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे विश्वासराव सांगतात.
विश्वास देसाई, ९४२११४५०८३
(शब्दांकन : एकनाथ पवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.