Pune News : वाल्हे आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, दौंडज, राख या परिसरावर पाण्याअभावी बहुतांश ठिकाणीची पिके जळाली आहेत तर काही पिकांनी माना टाकल्या आहेत. नागरिकांना फळबागा, जनावरे जगविण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न बनल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाल्हे परिसरातील गावांसह वाड्यावस्त्यांवर पावसाअभावी दुष्काळाची छाया गडद झाली आहे. भाजीपाला पिकांसह फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पावसाअभावी बहुतेक परिसरातील शेतातील उभी पिके जळून गेली आहेत.
तर वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, अनेक दिवसांपासून दररोज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाच्या वाढत्या काहिलीने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पिके वाचविण्याचे आव्हान असून चारा टंचाईदेखील निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना बागायती पट्ट्यातून जादा बाजारभावाने चारा विकत घ्यावा लागत असल्याने परिसरामध्ये चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
आडाचीवाडी परिसरात १२ ते १५ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरसाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव याचे आर्थिक गणित बसत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाने हमीभावाचे बळ द्यावे
बँक, पतसंस्थांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी फळबागांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी जेमतेम खर्च व झाडांना जीवदान देण्यात त्यांना यश आले आहे. नुकताच अंजिराचा बहर सुरू झाला असून त्यांच्या या प्रयत्नांना शासनाने हमीभावाचे बळ द्यावे, अशी मागणी संभाजी पवार, मंगेश पवार, सुहास खवले, प्रशांत पवार या अंजीर उत्पादकांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.