Drought Crisis : पाण्यात पाणी मिसळलेच नाही

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी सप्टेंबरमध्ये ८२ गावे ४०४ वाड्या-वस्त्यांवरील लोकांना ८६ टँकरचा आधार घ्यावा लागत होता. पिण्याच्या पाण्याची ही अवस्था असल्याने शेतीला कुठून पाणी मिळणार.
Drought Crisis
Drought CrisisAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांसह सर्वच तालुक्यांत पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सप्टेंबरमध्ये ८२ गावे ४०४ वाड्या-वस्त्यांवरील लोकांना ८६ टँकरचा आधार घ्यावा लागत होता.

पिण्याच्या पाण्याची ही अवस्था असल्याने शेतीला कुठून पाणी मिळणार. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण तालुक्यांतील खरीप वाया गेला, तर परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने आता रब्बीही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अनेक भागांत आतापासूनच विहिरी आणि बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. जाधववाडी (ता. माण) गावातील आजही प्रमुख तलावांसह दही सिमेंट बंधारे कोरडे पडले आहेत. खरिपातील बाजरी, ज्वारी, कांदा ही पिके शेतकऱ्यांना सोडून द्यावी लागली आहेत. माण तालुक्यात सर्वांत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाची सुरुवात समस्यांतून झाली. पाऊस येईल या आशेवर उशिरा का होईना पेरण्या केल्या. मात्र जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने होत्याचे नव्हते झाले.

Drought Crisis
Drought Crisis In Diwali : पीक-पाण्याशिवाय चैतन्य कुठून येणार?

माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिके डोळ्यासमोर वाळून गेली. या तालुक्यातील जाधववाडी हे छोटेसे गाव असून, खरिपात ज्वारी, बाजरी, कांदा व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. गावात एका मोठा तलाव असून, ओढ्यावर दहा सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळी चार ते पाच दमदार पाऊस झाले तर हे बंधारे भरतात. यानंतर परतीचा पाऊस झाल्यावर पाण्यात पाणी मिसळून रब्बी हंगाम घेता येतो.

या वर्षी मात्र गावातील चित्र बदलून गेले आहे. खरिपात पाऊस नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे तलावासह सर्वच सिमेंट बंधारे कोरडेच राहिले. याचा परिणाम विहिरीच्या पाणी पातळीवर झाला आहे.

दुष्काळाचे चक्र असल्याने येथे शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय अनेक शेतकरी करतात. पावसाअभावी चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने चारा विकत घ्यावा लागला होता. आजही गावागावांत मुरघास विकत घ्यावा लागत असल्याने अर्थकारण बिघडले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Drought Crisis
Drought Crisis : रब्बी सोडा, माणसं-जनावरं जगवणे मुश्कील

रब्बी हंगाम येऊनही शेतकऱ्यांकडून कामांना गती आलेली नाही. भांडवल घालून तोटा करावा लागेल ही भीती आहे. पाऊस न झाल्याने राज्य शासनाने नुकतीच दुष्काळ तालुक्याची नावे जाहीर केली. या तालुक्यात ५० टक्केही पाऊस झालेला नसल्यामुळे या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे.

तरीही या तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश झालेला नाही. एका बाजूला निसर्गाने मारले तर दुसऱ्या बाजूला सरकारने दुर्लक्ष केले. हे दुष्टचक्र आमच्या आयुष्याला जाणार, अशी भावना या तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे.

गावातील स्थिती

तलाव- १

सिमेंट बंधारे-१०

शेततळी-९

विहिरी- १००

बोअरवेल -१५०

जनावराचे गोठे- ५५

एक एकर क्षेत्रात बाजरी केली होती. तीन महिन्यांत जवळपास १६ हजार रुपये खर्च केला. पाऊस न झाल्याने पिकांची वाढ झाली नाही. नुकतेच पीक काढले असून अवघे एक पोते झाले.
- सुरेश मदने, शेतकरी
पाऊस न झाल्याने शेतीची अवस्था वाईट आहे. पाण्यावाचून पिके डोळ्यासमोर वाळून गेली आहेत. दुष्काळाचे चटके सोसूनदेखील तालुक्याचे यादीत नाव नाही, हे दुदैवी आहे.
- जोतिराम जाधव, शेतकरी
माझी एक एकर केळीची बाग होती. ती जगविण्यासाठी खूप धडपड करावी लागली. मात्र पाऊस न झाल्याने ही बाग सोडून दिली आहे. आंब्याची झाडे सुकून गेली आहेत. मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
- शिवाजी खरात, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com