Pomegranate Flower Drop : ढगाळ हवामानामुळे डाळिंब बागांत फूलगळ

Pomegranate Crop Damage : डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यांना कधी अतिपाऊस तर कधी ढगाळ हवामानाचा फटका बागांना बसू लागला आहे.
Pomegranate Orchard
Pomegranate OrchardAgrowon
Published on
Updated on

Sangli News : देशात यंदा मृग बहरातील डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंब बागा फुलल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यांना कधी अतिपाऊस तर कधी ढगाळ हवामानाचा फटका बागांना बसू लागला आहे. परिणामी फुलगळीची समस्या जाणवू लागली असल्याने सद्यःस्थितीला १५ टक्के फूलगळ होवू लागली आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट ओढावले आहे.

कोरडवाहू पट्ट्यात कमी पाणी, पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. अनेक भागात उपलब्ध पाण्यावर एप्रिल मे महिन्यात आगाप मृग बहार धरण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. यादरम्यान, शेतकरी बागांची हलकी छाटणी करुन बागा ताणावर सोडतात. या बागा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुलोरावस्थेत येतात. जून महिन्‍यापासून बहर धरण्याची गती वाढली जाते. यंदा देशात ६० हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. त्यापैकी आगाप मृग बहर सुमारे ३० हजार हेक्टर तर जून महिन्यात ३० हजार हेक्टरवर धरला आहे.

Pomegranate Orchard
pomegranate damage : नैसर्गिक आपत्तींनी डाळींबाच्या वैभवाला घरघर

मे महिन्यात चांगला पाऊस झाला. तसेच डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने बागा फुलल्या. पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने काडी चांगली तयार होण्यास मदत झाली. त्यामुळे आगाप धरलेल्या बागा फुलोरावस्थेत असून फुलांचे सेटिंगही चांगले झाले आहे. मात्र, जून महिन्याभरात देशभरात पाऊस सुरू झाला. तसेच डाळिंब उत्पादक राज्यांत अतिपाऊस पडत आहे. तर काही वेळेस ढगाळ हवामान होत आहे. याचा परिणाम डाळिंबावर होवू लागला आहे. आगाप मृग बहर तीस हजार हेक्टरवर धरला आहे. या आगाप बहरातील डाळिंबाची फुलगळीची समस्या भेडसावू लागली आहे. सद्यःस्थितीला या बागेत १५ टक्के फूलगळ झाली आहे.

Pomegranate Orchard
Pomegranate Crop Damage : गुजरातमध्ये अतिवृष्टीचा मृग बहरातील डाळिंबाला फटका

तर जूनमध्ये धरलेल्या बागा फुलकळी निघण्यास सुरुवात झाली आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे फुटवे अधिक फुटू लागले आहेत. त्यामुळे खर्चही वाढू लागला आहे. आगाप धरलेल्या मृग बहरातील डाळिंब १०० ग्रॅम वजनाचे आहे. अतिपाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्यास आगाप धरलेल्या डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत.

१० हजार हेक्टरने मृग बहराचे क्षेत्र वाढले

गतवर्षी देशात ५० हजार हेक्टरवर मृग बहरातील डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. यंदा वळीव पावसाने वेळेत हजेरी लावली. त्यातच पूर्वमोसमी पाऊसही झाल्याने देशभरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मृग बहर धरण्याचे नियोजन केले. काही पट्ट्यात पुरेसे पाणी असल्याने बहर धरला. यामुळे यंदाच्या हंगामात १० हजार हेक्टरने बहराखालील क्षेत्रात वाढ झाली असून यावर्षी ६० हजार हेक्टरवरील डाळिंबाची विक्री होणार आहे.

यंदाच्या हंगामात पोषक वातावरण असल्याने डाळिंबाच्या बागा फुलल्या. मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंबाला बसू लागला आहे. त्यातच आता फुलगळ होऊ लागली आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, जि. सांगली

तज्ज्ञांचा सल्ला...

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा म्हणाल्या की, सततच्या पावसात डाळिंबात फूलगळीची समस्या येऊ शकते. सोलापूर रेड वाणाच्या तुलनेत भगवा वाणात ही समस्या जाणवते. भगवा वाणात साखरेचे प्रमाण (टीएसएस) घटते. फूलगळीची समस्या कमी करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उदा. झिंक, बोरॉन आदींचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. संजीवकांचे प्रमाण असंतुलित झाल्यानेही फूलगळ होते. त्यासाठी नॅप्थील ॲसिटिक ॲसिड किंवा संजीवक म्हणून कार्य करणारे टू- फोर डी किंवा सिक्स बीए यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने व शिफारशीनुसार करावा.

संपर्क : डॉ. ज्योत्स्ना शर्मा - ०९६२३४४४०९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com