Dr. Satilal Patil : जोडल्याने होत आहे रे...

गेल्या आठवड्यात अमेरिकी शास्त्रज्ञांनी ज्या संशोधनाची घोषणा केली, ते अणुऊर्जेच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरणार आहे. या आगोदर अणू तोडून ऊर्जा तयार केली जायची. पण नावीन संशोधनात दोन अणूंची युती करून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी ड्युटेरिअम आणि ट्युटेरिअम या जड हायड्रोजनच्या अणूंवर लेसर किरणांचा मारा करून त्यांना एकमेकांशी जोडले गेले. ही अभिक्रिया व्हायला २.०५ मेगाज्यूल एवढी ऊर्जा दिली गेली आणि त्यातून ३ मेगाज्यूल एवढी ऊर्जा बाहेर पडली. १.५ ऊर्जा घटक जास्तीचा मिळाला. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास पेरलं तेवढंच उगवलं तर काय फायदा? पण या प्रयोगात खर्च केलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जेचं उत्पादन या अभिक्रियेतून झालं आणि संशोधकांचा हेतू साध्य झाला.
Dr. Satilal Patil : जोडल्याने होत आहे रे...

या आठवड्यात अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स रिसर्च प्रयोगशाळेतील संशोधकांनी सकारात्मक बातमी दिली. त्यांनी घोषित केलं, की अणूंची एकत्रीकरण अभिक्रिया यशस्वी झाली असून, त्यातून त्यांना जास्तीची ऊर्जा मिळाली. या बातमीने संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला. जगभरातल्या प्रसिद्धिमाध्यमांनी याची दाखल घेतली.

आण्विक विकिरण शास्त्राची प्रथमावस्था १८९५ ते १९४५ च्या काळात होती. त्यात शेवटची सहा वर्षे महत्त्वाची होती. १७८९ मध्ये युरेनियम शोधलं गेलं. जर्मन रसायन शास्रज्ञ मार्टिन क्लाप्रोथने ते शोधलं आणि युरेनस ग्रहाच्या नावावरून त्याच नामकरण करून टाकलं. मधल्या काळात बऱ्याच संशोधकांनी आण्विक संशोधनात भर घातली. पुढे १९३९ मध्ये त्याची अतिप्रचंड ऊर्जा निर्माण करणारी साखळी अभिक्रिया उलगडली. एक अणू तुटल्यावर त्यातून जी ऊर्जा तयार होते, तिच्या आघाताने अजून अणूचं विखंडन होतं. त्यातून परत ऊर्जा आणि परत विखंडन... अशी ही तुटातुटीची प्रक्रिया साखळी क्रिया सुरू असते. त्यामुळे महाविध्वंसक ऊर्जेचा उद्रेक होऊन विस्फोट होतो.

Dr. Satilal Patil : जोडल्याने होत आहे रे...
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

अणुस्फोटाचं वापर युद्धात करायच्या कल्पनेने पछाडलेल्या अमेरिकेने १९३९ ते ४५ या काळात फक्त अणुबॉम्ब बनवण्याच्या उद्देशानं अणुसंशोधन केलं. मॅनहॅटन प्रोजेक्ट हा गाजलेला प्रकल्प. हा संशोधन प्रकल्प १९४२ ते १९४६ दरम्यान अमेरिकेच्या मॅनहॅटन येथे राबवला गेला.

या प्रकल्पादरम्यान अमेरिकेने अणुबॉम्ब बनवून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीचं अणुवाटोळं करून बॉम्बची युद्धाचाचणी करून घेतली. ९७०० टनांच्या ‘लिटल बॉय’ने हिरोशिमात पाच चौरस मैलाचा परिसर उद्‌ध्वस्त करत १.४ लाख लोकांचा बळी घेतला. दुसरीकडे साधारणतः पाच टनांच्या ‘फॅट मॅन’ने नागासाकीत तीन चौरस मैलाचा प्रदेश उद्‌ध्वस्त करत लिटल बॉय एवढेच लोक मारले. पुढे कित्येक दशके येथील जमीन पडीक झाली. किरणोत्सर्गाने सजीवसृष्टी नष्ट केली.

Dr. Satilal Patil : जोडल्याने होत आहे रे...
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

दुसऱ्या महायुद्धानंतर समीकरणं बदलली. औद्योगिक क्रांतीची लाट जगभर पसरली. ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. संपूर्ण जग ऊर्जेच्या शर्यतीत पळू लागलं. तेलाच्या विहिरींचे मालक असलेले आखाती देश गब्बर होऊ लागले. पाश्‍चिमात्यांनी अणुबॉम्बच्या जोरावर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या फायद्यात वाटा मिळवला. ऊर्जेच्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धे देखील होऊ लागली. तेलाच्या जोडीला कोळसा जाळून ऊर्जेची गरज भागवली जाऊ लागली. पण तेल असो की कोळसा, पर्यावरणाला काळं फासणारच. जागतिक तापमानवाढीचा धोका त्यामुळे वाढू लागला. निसर्गाचं चक्र डळमळीत होऊ लागलं.

स्वच्छ आणि कमी प्रदूषण करणाऱ्या ऊर्जास्रोतांचा शोध सुरू होताच. त्यासाठी आण्विक ऊर्जेकडे पर्याय म्हणून पहिले जाऊ लागले. हिरोशिमात लाखो बळी घेत जगाला आपल्या अणुदादागिरीचा धाक दाखवल्यानंतर, या तंत्रज्ञानांचा उपयोग ऊर्जा तयार करायला देखील होऊ शकतो, यावर अमेरिकेत संशोधन सुरू झाले. विध्वंसक सैतानाला बाटलीत घालण्याचा प्रयत्न सुरू झाला.

Dr. Satilal Patil : जोडल्याने होत आहे रे...
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

या तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जेसाठी करण्याचे प्रयत्न होते. अणुविखंडन अभिक्रिया नियंत्रित करून तिचा उपयोग जहाज चालवण्यासाठी आणि वीज तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. १९५६ नंतरच्या अणुसंशोधनाचा भर सुरक्षित अणुविद्युत प्रकल्प उभारण्यावर होता. या प्रकल्पातून वीज तयार होऊ लागली. पाणबुड्यादेखील आण्विक ऊर्जेवर महासागरात विहार करू लागल्या. पण अणुविखंडन प्रक्रियेवर आधारित अभिक्रिया नियंत्रित करायला कठीण होती. एकदा का अणूंची विखंडनक्रिया सुरू झाली, की ही साखळी नियंत्रित करणं जिकरीचं काम होत. त्यातून तयार होणारी ऊर्जादेखील मोठी आहे.

या प्रक्रियेत एखादा अपघात झालाच तर किरणोत्सर्ग पसरायचा धोका आहेच. रशियाच्या चेर्नोबेलमध्ये झालेला अपघात तुम्हाला आठवत असेलच. जपानमध्ये फुकोशिमा अणुप्रकल्प हे अलीकडचे उदाहरण. हा प्रकल्प चालवणे म्हणजे अणुबॉम्ब उशाशी बाळगण्यासारखं आहे. आतंकवाद्यांच्या हातात हे प्रकल्प पडल्यास घात होण्याची भीती आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी शास्त्रज्ञांनी ज्या संशोधनाची घोषणा केली ते अणुऊर्जेच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरणार आहे. या आगोदर अणू तोडून ऊर्जा तयार केली जायची. पण नावीत संशोधनात दोन अणूंची युती करून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.

यासाठी ड्युटेरिअम आणि ट्युटेरिअम या जड हायड्रोजनच्या अणूंवर लेसर किरणांचा मारा करून त्यांना एकमेकांशी जोडले गेले. ही अभिक्रिया व्हायला २.०५ मेगाज्यूल एवढी ऊर्जा दिली गेली आणि त्यातून ३ मेगाज्यूल एवढी ऊर्जा बाहेर पडली. १.५ ऊर्जा घटक जास्तीचा मिळाला. शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास पेरलं तेवढंच उगवलं तर काय फायदा? आणि व्यापाऱ्याच्या भाषेत, भांडवल टाकलं तेवढाच धंदा झाला तर उपयोगी नाही. पण या प्रयोगात खर्च केलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जेचं उत्पादन या अभिक्रियेतून झालं आणि संशोधकांचा हेतू साध्य झाला.

तुम्हाला प्रश्नश्‍न पडेल, की एवढं काय विशेष आहे या बातमीत? सतत वेगवेगळ्या क्रियाअभिक्रियांचा खेळ मांडत बसलेले संशोधक, संशोधन निबंध प्रकाशित करतच असतात की? अणुफ्युजनच्या माध्यमातून मिळालेल्या या सरप्लस ऊर्जेच्या बाबतीत एवढी चर्चा का होतेय? याचं उत्तर म्हणजे सध्याच्या अणुविखंडण पद्धतीचे तोटे या प्रक्रियेत नाहीत. फ्युजन पद्धत त्यामानाने सुरक्षित आहे. किरणोत्सर्गाचा धोका नाही. बरं या मध्ये वापरला जाणारा कच्चा माल देखील त्यामानाने स्वस्त आहे. अणुफ्युजन पद्धतीतून तयार झालेली ऊर्जा ही पर्यावरणाचं कमी नुकसान करत स्वस्त आणि सुरक्षित पर्यायी ऊर्जास्रोत उपलब्ध करण्याची संधी घेऊन आली आहे.

साडेतीनशे कोटी रुपये खर्चून १९९७ मध्ये स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेचा उद्देश सफल झालाय. प्रयोगशाळेतील प्रयोग यशस्वी झालाय आणि पुढच्या दहा वर्षांत व्यावसायिक पातळीवर हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे. २०५० पर्यंतच्या शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल यात शंका नाही. या शोधाकडे अजून वेगळ्या नजरेने देखील पहिले जाऊ शकते. युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न नाटो देश करताहेत.

रशियाचा तेलाचा धंदा संपवण्यासाठी भारतासह इतर देशांवर दबाव टाकणे सुरू आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर स्वच्छ ऊर्जेचा बाजार बाळकावण्याची संधी अमेरिकेकडे चालून आलीय. पुढे इतर देशदेखील या स्पर्धेत उतरतील. अणुबॉम्बचा शोध लावून त्याच्या धाकावर जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेला ऊर्जेच्या बाजारावर अधिपत्य गाजवून त्यांच्या साम्राज्याची जागतिक पकड घट्ट करायची संधी निर्माण झालीय.

अणुशास्राचा विखंडन अभिक्रियेचा दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालेला प्रवास, युक्रेनच्या युद्धाकाळात लागलेल्या अणुएकत्रीकीकरण अभिक्रियेच्या शोधापर्यंत येऊन पोहोचलाय. तोडातोडीच्या प्रक्रियेचा अवलंब केल्यास विध्वंस आणि प्रदूषण होते, पण जोडाजोडीच्या अभिक्रियेत मात्र प्रदूषणविरहित ऊर्जा मिळते. बा माणसा, आण्विक अभिक्रियेने तोडातोडीपेक्षा जोडाजोडी जास्त फायदेशीर आहे हे दाखून दिलंय. बघ त्यातून काही आण्विक शिकवण घेता येते का? अणू जोडले तरी ऊर्जा मिळते, मग माणसं, हृदय आणि मनं जोडल्याने काय जादू होईल? याची तू कल्पना करू शकतोसच. नवीन वर्ष जवळ येतंय. बघ, नववर्षाचा काही जोडतोडीचा संकल्प करता येतो का?

(लेखक ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक आणि ड्रीमर अॅंड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com