Pune News : दुष्काळी पुरंदर तालुक्यात फळबाग हा उत्पन्नाचा शाश्वत स्रोत असून, विविध फळझाडांच्या लागवडीतून खळद हे गाव फळांचे गाव म्हणून नावारूपाला येईल. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी केले
ग्रामपंचायतीच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’च्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला एक अशी सुमारे ७०० जांभळाच्या झाडांचे मोफत वाटप गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठीच्या अर्जांचे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक बबनराव कामथे, सरपंच भाऊसाहेब कामथे, माजी सरपंच कैलास कामथे, उपसरपंच छाया कामथे, सोसायटीचे अध्यक्ष विकास कामथे, ग्रामपंचायत सदस्या आशा रासकर, रोहिणी कामथे, सदस्य योगेश कामथे, संदीप यादव, ग्रामसेवक महेंद्र लोणकर यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या, की आपल्या भागात पाऊस न पडल्याने आपला तालुका दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे, याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची गरज आहे. फळबाग लागवडीतून पर्जन्यमान वाढीबरोबरच आॉक्सिजनचे प्रमाण वाढेल, निरोगी पिढी तयार होईल व आजच्या कामाचा पुढच्या पिढीला लाभ होईल.
यामुळे खळद ग्रामपंचायत गेली दोन-तीन वर्षे नागरिकांना झाडांचे वाटप करीत आहे. हा खरोखरच स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाने आपल्या अंगणात विविध प्रकारची फळझाडे लावावीत. येत्या काही दिवसांत खळद हे गाव फळांचे गाव म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश कामथे यांनी केले तर आभार कैलास कामथे यांनी मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.