
Pune News : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय यंत्रणेवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचे नियंत्रण राहिलेले नाही. क्षेत्रीय कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये सतत धुसफुस सुरू असून, तशा तक्रारी कृषी आयुक्तालयाकडे आल्या आहेत.
कृषी विभागाची राज्यस्तरीय मुख्यालये अस्थिर झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांमधील नियोजनदेखील ढासळले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याला कृषी आयुक्त व कृषी सचिव नव्हता. तसेच, तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे मूळ कामाकडे झालेले दुर्लक्ष व त्यानंतर नव्याने आलेले कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाचा लागलेला निकाल, तंत्र अधिकाऱ्यांपासून ते संचालकांच्या बदल्यांमध्ये झालेला घोडेबाजार यामुळे कृषी विभागाची मुख्यालये अस्थिर झाली.
या सर्व घडामोडींचा परिणाम कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांवर पडला. आता कृषी विभागाला नवे आयुक्त व सचिव मिळाल्याने दोन्ही मुख्यालये काही प्रमाणात पूर्वस्थितीवर आली आहेत. परंतु क्षेत्रीय नियोजन अद्यापही कोलमडलेले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
चौकशीविना कारवाई नको
दुसऱ्या बाजूला ‘महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेने’ क्षेत्रीय पातळीवरील काही गंभीर मुद्दे कृषी आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. ‘तालुका कृषी अधिकारी व क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सतत वाद होत आहेत. त्यातून तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठ कार्यालयांकडे सतत तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे शासकीय कामकाजात दिरंगाई होते आहे. वरिष्ठांनी परस्पर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करू नये.
तक्रारीची आधी सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळून आल्यावरच शासकीय नियमानुसार कारवाई करावी, असे मुद्दे या संघटनेने मांडले आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात क्षेत्रीय पातळीवर यापुढेही तक्रारी होत राहिल्यास आम्हाला शासकीय काम करणे अवघड होईल. त्यामुळे कृषी विभागाच्या एकूण कामकाजावरदेखील विपरीत परिणाम होईल. याबाबत आम्हाला चर्चा करण्यासाठी वेळ द्या, असेही राजपत्रित अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तांना कळविले आहे.
...अशी आहेत तणावाची कारणे
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये क्षेत्रीय पातळीवर दोन कारणांमुळे तणाव होत असल्याचे राजपत्रित अधिकाऱ्यांनी लेखी नमूद केले आहे. ‘क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियोजनानुसार दिलेली कामे मुदतीत पूर्ण केली जात नाहीत. वरिष्ठांनी कामे सांगितल्यानंतर ती टाळली जातात,’ असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कृषी सहायकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात सिल्लोडच्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच पनवेल व शेवगाव येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांच्या वादातून तक्रारी केल्या गेल्या आहेत. तालुकास्तरीय आढावा सभेतदेखील काही ठिकाणी वाद होत आहेत. या प्रतिकूल घडामोडी थांबायला हव्यात; अन्यथा शेतकऱ्यांना सेवा देण्यात आणखी अडथळे तयार होतील, असा इशारा काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.