
Dharashiv News : जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी बँकांनी पीककर्ज आणि अन्य योजनांसाठीचे कर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावेत. पीककर्ज वाटपासाठी बँकस्तरावर शिबिरांचे आयोजन करावे. जूनअखेरपर्यंत बँकांनी ७० टक्क्यांपेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक अधिकारी अमित कुमार व निशांत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, की बँकांनी पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, फळबाग आणि रेशीम शेतीकडे विशेष लक्ष देऊन विकासाला चालना द्यावी. खरीप हंगामात बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांचा पीकविमा काढून त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल, शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यात यावे.
प्रत्येक तालुक्यात बँकांशी संबंधित कामे पार पाडण्यासाठी बँकांचा एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा. यामुळे शेतकरी तसेच विविध कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करण्यास मदत होईल. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मत्स्य सहकारी संस्थांची बँकासोबत बैठक घेऊन त्यांना कर्ज वाटपासाठी पुढाकार घ्यावा.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे नूतनीकरण करण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. मुद्रा बँक योजनेतून जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग या योजनेतील प्रस्तावात त्रुटी असेल तर संबंधितांना
परत करून त्रुटीची पूर्तता करून पुन्हा परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे व त्या प्रकरणांना बँकांनी मंजुरी द्यावी. रेशीम विकास विभागाने आरसेटीच्या माध्यमातून युवा वर्गातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळेल व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करावी. त्यामुळे अनेकांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
यासाठी बँकांनी तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करावे. महिला बचत गटांचे कर्ज प्रकरणे बँकांनी मंजूर करावे. बँकांनी केवळ कर्ज प्रकरणे मंजूर करून चालणार नाही तर प्रत्यक्षात कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही पुजार यांनी बँकांना बजावले. या वेळी विविध महामंडळाच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. विविध बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक या वेळी उपस्थित होते. बँकांनी मंजूर केलेल्या व प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणांची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी या वेळी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.