Solapur News : संस्था जिवंत ठेवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. येत्या काळात आसवनी प्रकल्पाची जबाबदारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्यावर सोपविली असून, भविष्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केले.
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. ३०) झाली, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या हंगामातील ऊसबिल देण्यासाठी थोडी अडचण झाली, मात्र यावेळी तसे होणार नाही. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना सज्ज झाल्याचे अध्यक्ष महाडिक यांनी सांगितले.
नैसर्गिक अडचणींपेक्षा मानवनिर्मित अडचणी मोठ्या प्रमाणात आल्या, परंतु सभासद व कामगारांच्या सहकार्याने त्यावर मात करता आली. प्रतिदिन दोन लाख लिटर उत्पादन क्षमता असलेल्या आसवनी प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, तो लवकरच कार्यान्वित करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने साडेसहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार महाडिक म्हणाले, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारात आमूलाग्र बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. सहकाराचा अभ्यास असल्याने त्यांनी माझी सहा समित्यांवर निवड केली आहे. लहानापासून मोठ्या सहकारी संस्था तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या संस्थांना २७ प्रकारचे प्रकल्प राबविण्याची ताकद दिली जाणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शेती अधिकारी शिवरकर, धनंजय देशमुख, शिवाजी शेंडगे, संतोष चव्हाण, पांडुरंग ताटे, भारत पाटील, झाकीर मुलाणी, माणिक बाबर, शिवाजी गुंड, राजू बाबर, महादेव देठे, छगन पवार, लिंगराज शेंडगे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.