
Sangli News : केंद्राकडून साखर निर्यातीवर आलेली बंधने पाहता साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मितीवर भर देणे फायदेशीर ठरणार आहे. यावर्षी पाऊस नसल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. कारखान्यांना कमी कालावधीत विना अडथळा जास्त साखर उत्पादित करावी लागेल.
लोकसभा निवडणुका होईपर्यंत केंद्र साखर निर्यातीसाठी परवाना देण्याची शक्यता नाही. साखर उद्योगात अडचणीचा काळ आला आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास शिक्षणचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, सुनीता नाईक, डॉ. शिमोनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक म्हणाले, की पाऊस नसल्याने कमी दिवसांत जास्त गाळप करण्याचे नियोजन आहे. डिस्टिलरीसाठी वेगळी यंत्रणा, प्रतिदिन ७ हजार ५०० टन गाळप करणार आहे. सध्या सर्व कारखाने गाळप व डिस्टिलरी क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संचालक विराज नाईक म्हणाले, की बायोगॅस, सहवीजनिर्मिती, डिस्टिलरी, गाळप यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याचा केंद्रबिंदू कर्मचारी आहे. उसावर वाढलेले रोग, पाऊसमान यामुळे १० ते १५ टक्के घट झाली आहे. उताराही कमी पडणार आहे. हंगामात ७.५ लाख टन गाळपाचे ध्येय आहे. ऊसतोड यंत्रणा गंभीर विषय बनला आहे. यावर्षी सात हार्व्हेस्टर मशिनद्वारे यंत्रणेचे नियोजन आहे.
अध्यक्ष आमदार नाईक व सुनीता नाईक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व संचलाक, खाते प्रमुख विभाग प्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.