
Pune News : रासायनिक खतांमुळे शेतीमालाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे दूधभेसळ, अन्नभेसळ टाळण्यासाठी देशी गोपालनासारखे कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गोवंश व संशोधन केंद्रामार्फत आयोजित ‘देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’सप्ताहाचे उद्घाटन कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १४) झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, देशी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी परिषदेचे महासंचालक वर्षा लड्डा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. सताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते. या वेळी विद्यापीठाच्या विविध ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
श्री. कोकाटे म्हणाले, ‘‘पूर्वी आपल्याकडे आदिकाळापासून शेतीला पशुपालन हा जोडव्यवसाय होता. शेण आणि गोमुत्र हे शेतीला खते म्हणून वापरली जात होती. शेतकऱ्यांच्या श्रीमंती ही गाई व बैल यांच्या गव्हाणीवर मोजली जायची. आता ही संख्या कमी झाली आहे. मागील काही काळापासून शेतीतील पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर वाढला. त्यातून माणसाचे आरोग्य बिघडले.
हे सर्व थांबवायचे असेल तर देशी गाई संशोधन प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. देशी गाईंच्या प्रकल्पासाठी बँकांनीही अर्थपुरवठा करण्याची गरज आहे. देशात शेतीचे उत्पादन वाढले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हा देशी गाईचा जो प्रकल्प आहे तो दिशा देणारा आहे.
देशातील हा एकमेव प्रकल्प असल्याने राज्यातील इतर तीनही कृषी विद्यापीठांनी अनुकरण करावे. देशी गाईंच्या शेण व गोमुत्रापासून मिळणाऱ्या उपउत्पादनांचा वापर वाढविण्यासाठी अनुदान देण्याचा कृषी विभागाचा विचार आहे. तसेच मराठवाडा व विदर्भात गोपालन वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, की शेती हा राज्यातील शेतकऱ्यांचा मुख्य घटक आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद कमी आहे. ती वाढविण्याची गरज आहे. ती जर वाढवली तर संशोधन, उत्पादन वाढ, कमी खर्चात अधिक उत्पादन, तंत्रज्ञानामध्ये वाढ होईल.
कार्यक्रमात देशी गाय संशोशन व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने, डॉ. मृणाल आजोतीकर यांनी सूत्रसंचालन केले. तर कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महानंद माने यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.