

शेतकरी : दीपक त्र्यंबक नाठे
गाव : कुर्नोली, ता. दिंडोरी, जि. नाशिक
एकूण क्षेत्र : १० एकर
वांगी लागवड क्षेत्र : १.५ एकर (शेडनेट)
नाठे यांचे एकूण १० एकर बागायती क्षेत्र आहे. त्यापैकी साडेतीन एकर क्षेत्रावर शेडनेट उभारणी केलेली असून, त्यात वर्षांपासून मुख्य पीक म्हणून ढोबळी मिरची लागवड केली जाते.
मागील काही वर्षांत दोन एकरांवर ढोबळी मिरची, तर दीड एकरात पीक पद्धतीचा अभ्यास करून अलीकडे नव्यानेच भरताच्या वांग्याची लागवड केली जाते. ही वांगी रंगाने जांभळी, लांब गोलाकार प्रकारची आहे. योग्य व्यवस्थापन आणि वाण निवडीतून अधिक उत्पादकता आणि गुणवत्ता साधली आहे.
मागील काही वर्षांत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत असताना बाजारातील मागणीचा अभ्यास केला. त्यानुसार बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादनावर जोर दिला आहे. बाजारातील मागणी आणि हमखास मिळणाऱ्या चांगल्या दरांचा अभ्यास करून त्यांनी वांगी लागवडीचा निर्णय घेतला.
लागवडीपूर्व तयारी
लागवडीपूर्वी जमीन तयार करून घेतली. त्यात ५ बाय अडीच फूट अंतराचे बेड तयार केले. बेडवर शेणखत, सेंद्रिय खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या. त्यानंतर बेडवर ३० मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरून घेतला.
वाण निवड व रोपनिर्मिती
लागवडीसाठी योग्य जातीचे, चांगले उत्पादन देणारे खात्रीशीर बियाण्यांचा स्वतः खरेदी करतात. जेणेकरून भरताच्या जांभळ्या रंगाच्या गोल लांबट वाणाची वांगी मिळतील. खरेदी केलेले बियाणे रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका धारकाकडे दिली.
साधारण ३५ दिवसांनी गुणवत्तापूर्ण आणि सुदृढ रोपे तयार होतात. त्यानंतर तयार रोपांची दीड एकरांत शेडमध्ये साधारण १० मार्चच्या दरम्यान लागवड करण्यात आली.
खत व्यवस्थापन
- पिकाच्या वाढीच्या अवस्थेत रासायनिक खतांचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार खतांचे नियोजन केले जाते. वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा देण्यामुळे झाडाची वाढ, फुलधारणा, फळ पक्वता चांगली मिळते.
- झाडाची वाढ, फुलधारणा, फळधारणा आणि पक्वता चांगली होण्यासाठी नत्र स्फुरद पालाश यांची संतुलित मात्रा दिली जाते.
- लागवडीनंतर दर ८ दिवसांनी ०:५२:३४ ची मात्रा दिली जाते.
- वाढीच्या अवस्थेत १२:६१:०, डीएपी, दाणेदार २४:२४:२४, १८:४६:० यांचा वापर केला जातो.
- फळांना चांगला रंग येण्यासाठी फेरसची अधिक गरज असते. त्यासाठी योग्य प्रमाणात फेरसची मात्रा दिली जाते.
- दर ८ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात.
- जमिनीतील वाफसा अवस्थेनुसार दर चौथ्या दिवशी ठिबकद्वारे सिंचन केले जाते.
कीड, रोग नियंत्रण
वांगी लागवडीत सर्वाधिक शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते. त्यानुसार प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार फवारण्या घेतल्या जातात. विशेषतः एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यासाठी चिकट सापळे लावण्यात आले आहेत.
विक्री नियोजन
- लागवडीनंतर साधारणपणे ६० दिवसांनी झाडे बांधणीची कामे केली जातात.
- लागवडीनंतर ७० ते ८० दिवसांत वांगी काढणीस सुरुवात होते. दर ५ दिवसांनी मजुरांच्या मदतीने वांगी तोडणी केली जाते.
- प्रति आठवडा दीड एकरांतून साधारण ४०० क्रेट माल निघतो.
- योग्य बाजारभाव मिळण्यासाठी फळांची तोडणी योग्य वेळी होणे आवश्यक आहे. त्यानुसार योग्य वाढ आणि आकर्षक रंगाच्या फळांची काढणी केली जाते.
- काढणीनंतर फळांची प्रतवारी केली जाते. कीडग्रस्त फळे वेगळी काढली जाते.
- तोडणीनंतर फळांचे योग्य पॅकिंग केले जाते. बाजारात पोहोचेपर्यंत मालाचा दर्जा चांगला राखला जावा, यासाठी पॅकिंगवर विशेष भर दिला जातो.
व्यवस्थापनातील मुख्य बाबी
- संरक्षित पीक पद्धतीचा अवलंब. त्यासाठी शेडनेट उभारणी.
- किमान उत्पादन खर्चासाठी माती व पाणी परीक्षण.
- वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांचा वेळापत्रकानुसार वापर.
- झाडांच्या गरजेनुसार प्रमाणशीर पाणी वितरणासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर.
- लागवडीनंतर दिवसाआड आळवणी.
- सुरुवातीच्या काळात वेळापत्रकानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा.
संपर्क - दीपक त्र्यंबक नाठे, ९६५७१२१०९५, (शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.