
Mumbai News: ‘‘मला पक्षनेृत्वाने काहीही विचारलेले नाही. मी काही चुकीचे केले आहे असे वाटू नये यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. यापुढे मला माध्यमांशी बोलून खुलासा देण्यात स्वारस्य नाही. मला जे बोलायचे नसते ते सोयीने दाखवले जाते. त्यामुळे योग्य संदेश जात नाही हे लक्षात आले आहे. माझा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देणार आहे,'''' असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही मुंबईत नसल्याने सोमवारी (ता. २८) त्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे श्री. कोकाटे यांनी स्पष्ट केले. ते बुधवारी (ता. २३) उपमुख्यमंत्री पवार यांना मुंबईत भेटणार होते. मात्र श्री. पवार पुण्यात असल्याने आणि मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असल्याने आपण मुंबईत आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. भेटीला येण्याऐवजी धुळे येथे गुरुवारी (ता. २४) होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा, अशी सूचना श्री. पवार यांनी त्यांना केली आहे.
कोकाटे यांची आक्षेपार्ह विधाने आणि वादग्रस्त वर्तणुक यामुळे उपमुख्यमंत्री पवार नाराज आहेत. दोघांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली असून श्री. पवार यांनी त्यांना सुनावल्याचेही समजते. विधानपरिषदेत जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आगपाखड केली. त्याचवेळी एक रूपयात पीक विमा योजनेच्या संदर्भात आपल्या आधीच्या वादग्रस्त विधानाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी राज्य सरकारबाबत वादग्रस्त वक्तव्य करून आणखी एक वाद ओढवून घेतला.
त्यविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी रमी प्रकरणातही श्री. कोकाटे यांना खडे बोल सुनावले होते. उपमुख्यमंत्री पवारांनी मात्र कोकाटे प्रकरणावर माध्यमांशी बोलणे टाळले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याचे श्री. पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते; परंतु कोकाटे प्रकरणावर मात्र त्यांनी जाहीर भूमिका मांडली नाही.
नादान कृषिमंत्र्याला हाकला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लावून धरली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही कृषिमंत्र्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांची अवहेलना करणारा इतका नादान कृषिमंत्री राज्याने आजपर्यंत पाहिला नाही. स्वतःच्याच मंत्रालयाला ओसाड गावची पाटिलकी म्हणण्याऱ्या मंत्र्याला पदावर का ठेवले आहे हे कळत नाही. मी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना प्रश्न विचारतो की कोकाटेंना तुमची काही गुपिते माहीत आहेत काय?
त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही घाबरत आहात का? त्यांचे खाते बदलून उपयोग नाही. त्यांना मंत्रिमंडळातून हाकललेच पाहिजे. कोकाटेंनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आहे. पंचनामे ढेकळायचे करायचे का, असे म्हणाले आहेत. शेतकरी त्याचे पैसे साखरपुडे, लग्नाला उधळतो, अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. ते आता विधिमंडळात रमी खेळत आहेत. त्यांना आता मंत्रिमंडळातून मुक्त करा व २४ तास रमी खेळू द्या.”
खाते बदलण्याची चर्चा
श्री. कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे या खात्याची धुरा देण्यात येणार असल्याचे वृत्त बुधवारी पसरले होते. याबाबत दोन्ही नेत्यांनी इन्कार केला असला तरी वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याने श्री. कोकाटे यांच्याकडे कमी महत्त्वाचे खाते द्यावे असा मतप्रवाह पक्षात असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात श्री. कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.