Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू; शुक्रवारी आंदोलनात काय घडलं?

ज्ञान सिंग असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांचं वय ६५ होतं. शंभू सीमेवरील आंदोलनाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी राजेंद्र मेडीकल कॉलेज पटियालामध्ये भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू

शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यानं जीव गमवला. ज्ञान सिंग असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांचं वय ६५ होतं. शंभू सीमेवरील आंदोलनाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी राजेंद्र मेडीकल कॉलेज पटियालामध्ये भरती करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्ञान सिंह गुरुदासपुर जिल्ह्यातील चचेकी या गावाचे रहिवाशी होते, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसला ज्ञान सिंह यांचे पुतणे जगदीश सिंह यांनी दिली. मंगळवारी पोलिसांनी केलेल्या अश्रुधारा नळकांड्याचा भडिमार आणि पॅलेट गनच्या माऱ्यामुळे ६० हून अधिक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती विविध अहवालातून समोर आली आहे.  

डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी सरकारचे कान टोचले

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणात स्वतंत्र तुरुंग, बॅरीकेड्स लावले जात आहेत. ते शेतकरी आहेत गुन्हेगार नाहीत, असं म्हणत डॉ. मधुरा स्वामीनाथन यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे कान टोचले. डॉ. मधुरा हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या कन्या आहेत. त्या दिल्लीतील एक कार्यक्रमात बोलत होत्या. आंदोलक शेतकरी हमीभाव कायद्यासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करत आहेत. त्यावरही डॉ. मधुरा यांनी मत मांडलं. केंद्र सरकारनं हरितक्रांतीचे जनक डॉ स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला.

Farmer Protest
Chalo Delhi Farmers : दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या कांड्या, आंदोलनाला हिंसक वळण

शेतकरी आंदोलक आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बैठक  

गुरुवारी (ता.१५) रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि सत्यानंद राय यांनी किसान संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेत्यांशी तिसरी बैठक आयोजित केली. केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांची गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू झालेली बैठक रात्री २.३० वाजता संपली. पण त्यातून तोडगा निघाला नाही. यापूर्वी पहिली बैठक ८ फेब्रुवारी आणि दुसरी बैठक १२ फेब्रुवारी रोजी झाली होती. गुरुवारच्या बैठकीनंतर आता चौथी बैठक रविवार संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

कोण काय म्हणालं?

गुरुवारच्या बैठकीत सकरात्मक चर्चा झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केला. ते म्हणाले, "बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. चौथी बैठक रविवारी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केली आहे." असं मुंडा म्हणाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या मागण्यावर सखोल चर्चा झाली आहे. पंजाब सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सीमांवरील जिल्ह्यात इंटरनेट बंद करण्यात येणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेऊ." असं मान म्हणाले.

रविवारच्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर पुढची दिशा ठरवू. शेतकरी आंदोलन शांततेत सुरूच राहील, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांनी दिली. डल्लेवाल म्हणाले, "बैठकीत हमीभाव कायद्याबद्दल मागणी केली आहे. इतर मागण्यावरही चर्चा झाली. दीर्घ आणि सविस्तर चर्चा झाली आहे. शेतकरी शांततेत आंदोलन करतील. दोन्ही बाजूने शांतता राखली जाईल. सरकारने जबाबदारी घेतली आहे की, पोलिसांच्या बाजूने हल्ला केला जाणार नाही."

मंगळवारी शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. पॅलेट गन्स आणि लाठीमार करण्यात आला. त्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले. त्यामुळे आंदोलक भडकले होते. शुक्रवारी शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस होता. शंभू सीमेवर शेतकरी ठिय्या मांडून बसलेले आहेत. शेतकरी नेत्यांनी चर्चा सुरू आहे,  शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाऊ नये असं आवाहन केलं. पण  शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास शंभू सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांवर पुन्हा अश्रुधारा नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे शंभू सीमेवर तणाव वाढला.   

मनोज जरांगे यांचं आंदोलन

उच्च न्यायलयाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी सलाईन घेतलं. उपोषणा दरम्यान बुधवारी जरांगे यांची तब्येत खालवली होती. गुरुवारी त्यांना पोटदुखीचा त्रासही झाला होता. त्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा शुक्रवारी सातवा दिवस होता. शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. "सग्यासोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी केल्या सोडणार नाही. २० फेब्रुवारीच्या आत सरकारने निर्णय घ्यावा. मी उपोषण सोडणार नाही," असं जरांगे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेऊन सहकार्य विनंती केली. शिंदे म्हणाले, "राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. त्यानुसार टिकणारं आरक्षण देऊ. सरकार सकारात्मक असतं तेव्हा आंदोलन करणाऱ्यांनीही सरकारला सहकार्य करण्याची गरज असते. जरांगे यांना सकाळीच उपोषण मागे घेण्याबद्दल आवाहन केलं आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले. शुक्रवारी राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, सोलापुर, पुणे जिल्ह्यात मराठा समाजाकडून जागोजागी चक्काजाम आंदोलन करण्यात आली. हिंगोली, परभणी जिल्ह्यात बस वाहतूक बंद होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com