
Kharif Sowing In Sangli : सांगली जिल्ह्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पेरणी पूर्व मशागतीसह अन्य कामांत व्यग्र झाला आहे.
सध्या वाढत्या उष्णतेमुळे सकाळच्या टप्प्यात शेतीतील कामे पूर्ण करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.
खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या या पावसाच्या अंदाजावर होतात. त्यामुळे पेरणीपूर्व पाऊस या हंगामासाठी महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परंतु हा पाऊस मशागती करण्याइतपत झाला नाही.
त्यामुळे मशागती रखडल्या असल्याचे चित्र आहे. तरीदेखील शेतकरी मशागतीचे नियोजन करू लागला आहे.
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी केली जाते. मात्र, तालुक्यात वळीव पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात धूळवाफेवरील भाताची पेरणी विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे कडेगाव, पलूस तालुक्यांच्या काही भागांत आले पिकाची लागवड केली जाते. हळद लागवड सुरू झाली असली तर, गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवड थांबवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कृष्णा आणि नदीकाठच्या भागात मे महिन्यापासून आडसाली ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु उपलब्ध असलेले पाणी कमी पडेल या कारणामुळे ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे आला नसल्याचे चित्र आहे. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी शेतकरी शेतातील पालापाचोळा गोळा करून शिवार स्वच्छ करतो.
नांगरट, कुळवणी, माती बारीक करणे, बांध घालणे व फळ्याने माती ओढवून वाफे तयार करण्याची कामे केली जातात. वळीव पाऊस झाल्यास ही कामे करणे शेतकऱ्याला सोपे जाते व सोयीचे होते. या वर्षी वळीवाचा पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकरी पेरणीबाबत चिंताग्रस्त आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.