Jowar Cultivation : पौष्टिक ज्वारीची रब्बीत करुया लागवड
जागतिक स्तरावर मानवी आहाराच्या बाबतीत मतभिन्नता असेलही पण ज्यावेळी अखिल जगातील मानवाच्या समतोल आहाराचा (Healthy Diet) विचार करून आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो निर्णय घेत संदेश दिला जातो तो सर्व मानवासाठी हितावह असतो. त्यामुळे या बाबीचा अमलात आणण्याचा यथाशक्ति प्रयत्न करणे हे नक्कीच प्रत्येकाच्या हाती आहे. २०२३ हे पौष्टिक तृणधान्य वर्ष (International Millet Year) म्हणून घोषित केले आहे. यात सात अन्नधान्य पिकाचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे जे दररोज आपण आहारात घेतो अशा गहू (Wheat) आणि तांदूळ (Rice) या पिकांचा पौष्टिक अन्नधान्यांत (Nutritious Food Grain) समावेश नाही.
तर ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर अशा पिकांचा समावेश पौष्टिक अन्नधान्यांत समावेश आहे. त्यामुळे आता चालू होणाऱ्या रब्बी हंगामात आपण यातील काही पिकांची लागवड करून पुढील पौष्टिक तृणधान्य वर्षाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत, असा एक आहार जागृतीचा संदेश सर्वांना देऊया. यासाठी वर्ष २०२२ या रब्बी हंगामात ज्वारीची लागवड केली तरच पुढील वर्षी ती खाण्यासाठी उपलब्ध होईल नाहीतर आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्षातच ज्वारी खायला मिळणार नाही. तृणधान्य वर्षात हे अन्न म्हणून खाता येण्यासाठी या रब्बीत ज्वारीची लागवड होणे गरजेचे आहे.
एक महत्त्वाची बाब मला तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायची की रब्बी ज्वारी एकेकाळी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे असे पीक होते. अगदी तीस वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्हा हा रब्बी ज्वारीसाठी राज्यात प्रसिद्ध होता. माणसाला अन्न आणि बैलाला, गाईला तसेच इतर पशुधनाला वर्षभर ज्वारीचा कडबा मिळत होता. परंतु आता हे दिवस गेले आहेत. शेतकऱ्यांनी चक्क या पिकाकडे पाठ फिरवली आहे. या मागची कारणे हे सर्वांना माहीत आहेत. एकीकडे पौष्टिक अन्न आणि दुसरीकडे त्याचा तुटवडा अशी अवस्था आज ज्वारीची झाली आहे. यावर्षी तर मार्केटमध्ये रब्बी ज्वारी विक्रीसाठी फारच थोडी आली होती, अशी माहिती मिळाली आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून या पिकाकडे आत्तापासून पेरणीसाठी शेतकरी वळले पाहिजे, असे धोरण राबविणे गरजेचे आहे. केवळ वर्षे घोषित करून उपयोग होणार नाही, त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. ही बाब सत्य आहे की रब्बी ज्वारीची भाकर एक अन्न औषधी आहे. परंतु हे पीक फार अल्पक्षेत्रात पेरल्या जात आहे. आता रब्बी ज्वारीची पेरणी १५ ते २० दिवसांनी सुरू होईल. येणाऱ्या पंधरा दिवसांत या पिकाच्या अधिकाधिक क्षेत्रावर पेरणीसाठी विशेष लक्ष घ्यावे लागणार आहे. खरिपातील कापूस पिकावर रब्बी ज्वारीचे पीक घेता येत नाही. खरिपात मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी, आणि मका या पिकानंतर रब्बीत शेतकरी ज्वारी घेऊ शकतो.
अगदी वेळेवर पेरणी म्हटल्यावर तर फक्त मूग आणि उडीद याच पिकांनंतर रब्बी ज्वारीचे पीक घेता येते. सोयाबीन, मका, बाजरी हे पीक तयार होण्यासाठी अजून एक महिना अवधी लागेल. त्यानंतरही ज्वारी पेरता येईल, थोडा उशीर झालेला असेल पण रब्बी ज्वारी पेरणी करता येईल. गेल्या वर्षी पाऊस पडत गेल्याने अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन पिकानंतर काही शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केली. ती चांगलीही आली. रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान हा एक स्वतंत्र विषय आहे, पौष्टिक अन्नधान्य पीक म्हणून आवर्जून ज्वारी या पिकाची राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मला फक्त आठवण करून द्यायची आहे.
डॉ. सूर्यकांत पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता
रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.