Nagpur News : खरीप हंगामाच्या सुरुवातील शेतकऱ्यांचा जमिनीच्या खोलवर नांगरटीकडे कल असतो. ही परंपरागत मशागत पद्धती अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे पिकांचे रोगकारक घटक तसेच किडीचे कोष जमिनीवर येऊन उष्णतेमुळे प्रभावहीन होतात. परंतु हवामान बदलाच्या काळात या संदर्भाने संशोधनात्मक पातळीवर पुनर्विचार होण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय मृदा विज्ञान जमीन उपयोगिता संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. पाटील म्हणाले, की खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकरी जमिनीची मशागत करून ती तशीच मोकळी सोडतात. दीड ते दोन महिने जमीन तापवली जाते. यामुळे पिकाला रोगकारक घटक तसेच किडीचे कोष जमिनीवर येऊन उष्णतेमुळे प्रभावहीन होतात. आता मात्र सर्वच क्षेत्राला हवामान बदलाचा फटका बसत आहे.
यामध्ये शेती क्षेत्र सर्वांत पुढे आहे. जमिनीच्या मशागतीमुळे पिकाला अपायकारक बुरशी, किडीचे कोष जमिनीवर येत असले तरी त्यासोबत जमिनीतील उपयुक्त जिवाणू देखील सूर्यप्रकाशात येतात. त्यामुळे त्यांची जमिनीतील वाढीची प्रक्रिया धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नजीकच्या काळात दर दोन दिवसाआड तापमानात वाढ होते, तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडतो. हे विपरीत हवामान पिकांसाठी घातक किंवा पोषक जिवाणूंपैकी कुणासाठी पूरक आहे? यादृष्टीने संशोधनाची दिशा निश्चित होण्याची गरज आहे. विपरीत हवामान काही घातक जिवाणू, विषाणूसाठी पोषक ठरू शकते, तर याउलट काही पोषक जिवाणूंसाठी ते उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे या संदर्भाने देखील येत्या काळात जागृतीची गरज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.