
Pune News : जुन्नर, आंबेगाव तालुक्यांच्या पूर्व भागातील वाढीच्या अवस्थेतील पिके पावसाअभावी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे.
अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. जिरायती आणि बागायती भागांतील शेतकऱ्यांनी उसनवारी करून खरिपाची पेरणी केली आहे; मात्र पदरी नुकसान आल्यामुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
खरीप हंगामात जुन्नरमध्ये सरासरीच्या २९ हजार ७७७ हेक्टरपैकी २६ हजार ४७० हेक्टर म्हणजेच ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. आंबेगावमध्ये सरासरीच्या १६ हजार १४ हेक्टरपैकी १४ हजार ६१५ हेक्टर म्हणजेच ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
मात्र जून महिन्यात जुन्नरमध्ये ७६.५ मिलिमीटर, तर जुलैमध्ये ५३.३ मिलिमीटर, आंबेगावमध्ये जूनमध्ये १२७.६ मिलिमीटर, जुलैमध्ये ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात तुरळक सरी पडल्याने काही प्रमाणात पेरण्या झाल्या. परंतु आता पावसाअभावी सर्वच सर्वच पिके संकटात आली आहे.
सोयाबीनचे पीकदेखील संकटात आले असून, पूर्व भागात जनावरांच्या खाद्याचा प्रश्नदेखील आता भेडसावू लागला आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. जो काही दोन महिन्यांत तालुक्यात पाऊस पडला तो प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात पडला आहे.
खरिपात मका, बाजरी, फळबाग, सोयाबीन अशी पिके अडचणीत आली आहेत.यंदा कमी पाऊस पडल्याने यंदा शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा या पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
कृषी विभागाने तत्परता दाखवत गावस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करून पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.