Hingoli News : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सत्तार यांनी शुक्रवारी (ता. १) जिल्ह्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकी ते बोलत होते. खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे आदी उपस्थिती होती.
सत्तार म्हणाले, की पीक नुकसान झालेल्या एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने एकत्रितरीत्या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ७ डिसेंबरपर्यंत वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देणार आहे.
अनुदानातून कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये व व्याजामध्ये ही रक्कम वजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. नुकसान झालेला एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान हे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
या वेळी पापळकर यांनी मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेले नुकसान तसेच येलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची त्यासाठी लागणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. सत्तार यांनी हिवरा जाटु (ता. औंढा नागनाथ) येथील रुस्तुमराव शिंदे यांच्या शेतावर जाऊन नुकसान झालेल्या कापूस या पिकाची पाहणी केली. भिरडा, कानरखेडा बुद्रुक येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.