Mumbai News : यंदाच्या वर्षी पाऊस लवकरच गायब झाल्यामुळे शहापूर तालुक्यातील नागली, वरई, खुरासनी यासारखी वरकस पिके हातची गेली असल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शेतकऱ्यांच्या या वरकस पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी कृषिमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे जमीन सुकू लागली असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशात शिरोळ-अजनुपसह तालुक्यातील अनेक ठिकाणी वरई, नागली, खुरासनी, वाल, हरभरा, तूर आणि मूग ही पिके आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर घेतात.
भातकापणी केल्यावर लगेच या वरकस पिकांची पेरणी केली जाते. खरीप हंगामानंतर तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर या वरकस पिकांचे उत्पादन घेतले जाते. भातकापणीनंतर जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन हरभरा, मूग, तूर या कडधान्यांची पेरणी केली जाते. यंदा महिनाभर आधीच पाऊस परतल्यामुळे जेमतेम भातपिके शेतकऱ्यांच्या हाती आली आहेत.
खरेदी केलेली बियाणेही वाया
अनेक शेतकऱ्यांनी वरकस पेरणीसाठी खरेदी केलेली बियाणेही वाया गेले आहे. तसेच मजुरी खर्च, खते, पाणी याचा कमी खर्च येत असल्याने वरकस पिके शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देत असतात. पण यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांनी केलेली मशागत वाया गेली आहे. तसेच कृत्रिम पाणी उपलब्ध करण्यासाठी उत्पादनापेक्षा अधिक खर्च येणार असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.