Latur News : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व पिकांच्या उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते.
यंदाच्या खरीप हंगामात सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी तीनशे रुपये व आदिवासी गटासाठी दीडशे रुपये शुल्क आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वत:च्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान वीस आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत तालुका पातळीवर पहिले बक्षिस रुपये पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये व तिसरे बक्षीस तीस हजार रुपये आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.