
Latur News : लातूर : लातुरात जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, आता चक्क काळ्या रंगाचे पाणी नळातून येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्यही नसल्याने बहुतांश नागरिकांवर हे पाणी फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पण, अशा अशुद्ध, काळ्या आणि पिवळसर पाण्यावर उत्तर शोधण्यात महापालिकेला अजूनही यश आलेले नाही, असे स्पष्ट होत आहे.
लातुरात ऐन निवडणुकांच्या काळात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला अनेक महिने लागले. पण या प्रश्नानंतर गेल्या दोन महिन्यांपासून पाणी प्रश्नाने डोके वर काढले आहे. शहरात जवळपास सर्वच भागांत पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातच आता नळाद्वारे काळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी नारायणनगरसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी छायाचित्रांसह ‘सकाळ’कडे केल्या. याची प्रत्यक्ष पाहणीही ‘सकाळ’ने केली. यावेळी ‘तुम्हीच सांगा, असे पाणी प्यायचे कसे’, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबाबत चारच दिवसांपापूर्वी आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत बैठक घेतली होती. नळाद्वारे पाणी गढूळ-पिवळसर येत आहे, हे माहिती असूनसुद्धा तुम्ही त्याचा पुरवठा का करत आहात, गढूळ पाणी पिऊन एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न आमदार देशमुख यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला होता. गढूळ-पिवळसर पाण्यावर उपाय शोधून शुद्ध पाणीपुरवठा केला जावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. महापालिका पाण्यातील दोष सापडेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा बंद करणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पाणी फेकून देताना डोळे पाणावतात
सध्या नळाद्वारे येणारे दूषित पाणी कोणीच पिऊ शकत नाही. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी टाकून द्यावे लागत आहे. या पाण्याचा कुठलाच वापर करता येत नाही. असल्या कडक उन्हाळ्यात पाणी फेकून देताना खरोखर आमच्या डोळ्यांत पाणी येते.
- मथुराबाई रेड्डी (सीतारामनगर)
मत मागायला येता; काळे पाणी पाहायला या
मतदानाच्या वेळी घरोघरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते येत होते. हात जोडून मत मागत होते. ‘आम्हीच तुमचे कल्याण करू’, असे सांगत होते. आता निवडणुका संपल्या. त्यामुळे नळाला येणारे काळे पाणी बघायला, यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवायला आता राजकीय नेत्यांना वेळच नाही. हे पाणी पिता येत नाही आणि वापरताही येत नाही, अशी स्थिती आहे.
- ललिता पांचाळ, नारायणनगर
...तर जबाबदार कोण
आमच्याकडे विंधन विहीर नाही. महापालिका नळाद्वारे करीत असलेल्या पाणी पुरवठ्यावर आम्हाला अवलंबून राहावे लागते. या शहरात आमच्यासारखे अनेक जण आहेत. या पाण्याचा घाण वास येत आहे. असे पाणी आम्ही प्यायचे कसे, अशा पाण्यामुळे आजार झाले तर जबाबदारी कोणी घ्यायची.
- बालाजी पांचाळ (नारायणनगर)
ही वेळ असते का ?
आमच्या भागात सातत्याने पिवळे आणि गढूळ पाणी येत आहे. अशा पिवळसर आणि काळसर पाण्याचा महापालिका रात्रीच्या वेळी नळाद्वारे पुरवठा करीत आहे. आता रात्रीचे दहा ही पाणी पुरवठ्याची वेळ असते का? मनाला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढे पाणी नळाद्वारे सोडले जात आहे.
-कमलबाई स्वामी, सीतारामनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.