Nagar News : गरीब, वंचित कुटुंबातील मुलांना खासगी शाळांत मोफत प्रवेशासाठी राबवण्यात येत असलेल्या आरटीई योजनेचा यंदा बट्ट्याबोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात शाळा सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला मात्र अजूनही आरटीईमधून मोफत प्रवेश झालेले नाहीत. हे प्रवेश होतील की नाही याबाबतही संभ्रम आहे. शालेय शिक्षण विभाग याबाबत कोणताही खुलासा करत नसल्याने मुलांच्या प्रवेशाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा ते चौदा वयोगटातील मुलांना बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) अशंतः अनुदानित, विना अनुदानित सर्व माध्यमाच्या शाळांतील पहिलीच्या वर्गात आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यासाठी सबंधित शाळांच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा यासाठी राखीव ठेवल्या जातात.
आठवीपर्यंत संबंधित शाळेत मोफत शिक्षण मिळते. प्रवेशासाठी आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील पालकांकडून अर्ज मागवून घेत क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले तर सोडत काढली जाते. ही प्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारीतच होते. मात्र मागवलेल्या अर्जातून अजूनही प्रवेशासाठी सोडत निघालेली नाही. ज्या शाळांत हे प्रवेश दिले जातात, त्या शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम म्हणजेच अनुदानाची रक्कम दिली जात नाही, असा शाळांचा आरोप आहे.
नगर जिल्ह्याचा विचार करता ३५७ शाळांत आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्या शाळांमध्ये ३ हजार २३ विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी ९ हजार ६२७ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले. अर्ज छाननीनंतर ४ हजार ७०७ अर्ज पात्र झाले. त्यातून पावणे दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सोडत निघाली नसल्याने सोडतीत कोणाचा नंबर लागतो, हे निश्चित नसल्याने व सध्या योजना राबवली जाते ते संकेतस्थळ बंद आहे.
वारंवार शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशात बदल केल्याने पालकांत नाराजी होती. आता हे संकेतस्थळ बंद पडल्याने पालकांना अद्याप प्रवेशासाठी सोडतीचा तपशील समजला नाही. त्यामुळे यंदा प्रवेश मिळणार की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. प्रवेश कधी होतील, होतील की नाही हे ही सांगितले जात नाही. आठ वर्षांपूर्वी ही योजना सुरू झालेली आहे.
नववी प्रवेशासाठी धडपड
सहा ते चौदा वयोगटातील मुलांना आरटीईअंतर्गत आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळत असल्याने गरीब, वंचित आर्थिक मागास कुटुंबातील पालक खास करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश घेतात. मात्र आठवीनंतर संबंधित पालकांचा खरा संघर्ष सुरू होतो. एकतर नववीला त्या शाळांकडून भरमसाट शुल्क उकळले जात असल्याचे नगर शहर, जिल्ह्यात पहायला मिळत आहे. संपूर्ण अनुदानित शाळा असलेल्या विद्यामंदिरांकडून नववी प्रवेशासाठी पालकांची लूट केल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आरटीईमधून शिकलेल्या पालकांचा नववीला प्रवेश मिळत नसल्याने दुहेरी संकटातील पालकांची कोंडी होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.