
डॉ. देवानंद बनकर, डॉ. सखाराम आघाव
चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव साधारणपणे पेरणीपासून एक महिन्यानंतर पुढे सुरू होतो आणि तो पिकाच्या काढणीपर्यंत राहतो. साधारणतः जुलै ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंत ही कीड कार्यरत असते. वातावरण पोषक असल्यास या किडींमुळे ९० ते १०० टक्के झाडे कीडग्रस्त होऊ शकतात. त्यांच्यामुळे उत्पादनात ३० ते ६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. हे लक्षात घेऊन सोयाबीनवरील चक्रीभुंगा या किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन आणि नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
वातावरणातील जास्त आर्द्रता, उबदार तापमान, रिमझिम पाऊस आणि त्यानंतर पडणारा पावसातील खंड असे वातावरण चक्रीभुंगा या किडींच्या वाढीसाठी पोषक असते.
चक्रीभुंग्याचे शास्त्रीय नाव - ओबेरीओप्सिस ब्रेविस
(सेरेम्बायसिडीई : कोलीओप्टेरा)
ओळख आणि जीवनक्रम
चक्रीभुंगा त्याचा जीवनक्रम चार अवस्थांमध्ये पूर्ण करतो. अंडी, अळी किंवा ग्रब, कोष व प्रौढ भुंगा. यापैकी अळी आणि प्रौढ भुंगा या दोन्ही अवस्था पिकाचे नुकसान करतात.
प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा व ७ ते १० मिमी लांब असतो. समोरच्या पंखांचा अर्धा भाग काळा असतो. प्रौढ मादी देठ, फांदी किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करते व त्याच्या मधल्या भागात अंडी घालते.
चक्रकापाचा वरचा भाग, त्यामुळे वाळतो. एका ठिकाणी एक अशी जवळपास ७५ ते ८० अंडी एक मादी घालते.
चक्रीभुंग्याची अंडी फिक्कट पिवळसर रंगाची आणि लांबट आकाराची असतात. ३ ते ४ दिवसांत अंड्यामधून अळी बाहेर येते.
लहान अळी पांढऱ्या रंगाची असते. मोठी अळी पिवळसर रंगाची व गुळगुळीत असून, शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात.
अंड्यातून निघालेली अळी चक्रकापाच्या खालील देठ, फांदी पोखरत खोडाच्या बुडापर्यत पोहोचते. अळी अवस्था ३२ ते ६२ दिवसांची असते.
पूर्ण वाढ झालेली चक्रीभुंग्याची अळी पुढच्या पावसाळ्यापर्यत (ऑक्टोबर ते जून) झाडाच्या खोडात सुप्तावस्थेत जाते.
पहिला पाऊस झाल्यानंतर अनुकूल
वातावरणात अळीची सुप्तावस्था संपते आणि ती कोषात जाते. कोषावस्था ही ८ ते ११ दिवसांची असते.
कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व पिकावर अंडी घालतो. प्रौढ अवस्था ही साधारणतः ३० दिवसांची असते.
अनुकूल वातावरणात एका वर्षात चक्रभुंग्याचे दोन जीवनक्रम पूर्ण होतात.
नुकसानीची लक्षणे
पीक १५ ते २० दिवसांचे असताना प्रादुर्भाव झाल्यास जास्त नुकसान होते.
चक्रीभुंग्याच्या जास्त प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण घटते. दाण्याची संख्या आणि वजनही घटते.
पीक काढणीच्या वेळी चक्रकापाच्या ठिकाणी खोड तुटून पडते आणि नुकसान होते.
सोयाबीनशिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली इ. पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव होतो.
जुलै ते ऑक्टोबरपर्यंत कीड कार्यरत असते.
आर्थिक नुकसान पातळी
सरासरी १० टक्के किंवा ३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे प्रति मीटर ओळीत.
व्यवस्थापन
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत कोळपणी वा खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
पिकाला नत्र खताची मात्रा शिफारशीप्रमाणेच द्यावी. नत्र खते शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात दिल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
चक्रीभुंगाग्रस्त झाडांची पाने, फांद्या तोडून आतील किडीसह नष्ट कराव्यात.
पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अॅझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २० ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच, पुढीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. पुढील फवारण्यांसाठी कीटकनाशक बदलून वापरावे.
डॉ. देवानंद बनकर, ७७५७९८७४५९ संशोधन सहयोगी (क्रॉपसॅप), कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.