बरसीम हे रब्बी हंगामातील प्रमुख द्विदलवर्गीय चारा पीक (Fodder Crop) आहे. दुग्ध व्यावसायिकांसाठी द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा सतत भेडसावणारा प्रश्न असतो. त्यासाठी बरसीम घास (Barseem Ghas) हे रब्बी हंगामात ४ ते ५ कापण्या देणारे, कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथीवर्गीय चारा पीक आहे. या पिकाच्या मुळाशी असलेल्या गाठीतून नैसर्गीकरीत्या नत्र मिळते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारुन त्यानंतर घेतलेल्या पिकाला त्याचा फायदा होतो.
- पाण्याचा चांगला निचरा असणारी, मध्यम ते भारी तसेच चुना व स्फुरद भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या जमिनीत बरसीम चांगल्या प्रकारे वाढते. काहीशा प्रमाणात विम्लयुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे पीक वाढते; परंतु आम्लयुक्त आणि पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत बरसीम वाढत नाही.
- जमिनीमध्ये सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम क्षार जास्त असतील तर बरसीमच्या बियाच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. हलक्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात शेणखताचा वापर करावा.
- लागवडीसाठी एक खोल नांगरट करून एकदा डीस्क हॅरोने ढेकळे फोडून घ्यावीत. शेणखत पसरवून पिकासाठी जमीन तयार करावी. जमिनीची मशागत केल्यानंतर २ मीटर रुंद आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी ठेवून वाफे बनवावेत.
- दोन मीटर रुंद आणि दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार केल्यास पेरणीसाठी सुलभ व पाण्याच्या पाटामध्ये कमी क्षेत्र वाया जाते.हे पीक जमिनीमध्ये ५ ते ६ महिने राहणार असल्याने पुरेसे शेणखत जमिनीत मिसळावे.
- पेरणीपूर्वी मशागत करताना हेक्टरी १० ते १५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खतमात्रा पेरणीच्या वेळेसच द्यावी.
- लागवडीसाठी वरदान, बुंदेल बरसीम - २ या जातींची निवड करावी.
- हेक्टरी २५ किलो बियाणे लागते. लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी म्हणजे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी थंडी तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळते. तसेच पिकाच्या चार कापण्या मिळतात.
- पेरणी करण्यागोदर बियाणे १० टक्के मिठाच्या पाण्यामध्ये बुडवावे. यामुळे चिकोरी गवताचेबी पाण्यात तरंगून येते. हे बियाणे वेगळे करावे. खाली राहिलेले बरसीम बियाणे पाण्यातून बाजूला काढून पोत्यावर घ्यावे.
दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम आणि २५० ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे पूर्णतः सावलीमध्ये सुकवून घ्यावे. प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यामध्ये २५ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २ ते २.५ सें.मी. खोलीवर पेरावे. त्यापेक्षा जास्त खोलवर पेरणी केल्यास बियाणे उगवणीवर परिणाम होतो.
- पेरणीनंतर लगेच पाण्याची पहिली पाळी द्यावी. या पाण्याच्या वेळी वाफ्याच्या सुरवातीला पाण्याचा बाऱ्यावर गोणपाट अथवा झाडाचा पाला ठेवावा. त्यामुळे गवताचे बियाणे वाहून जात नाही.
- पहिली कापणी पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या २५ ते ३० दिवसांनी कराव्यात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.