
Dharashiv News : यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या दहा गावांतील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीच्या पंधरवड्यात पाच गावांतील क्षेत्र आणि त्यानंतर उर्वरित पाच गावांतील क्षेत्राला कुरनूर प्रकल्पातील पाणी मिळणार आहे.
या वर्षी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १२५ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रकल्पांप्रमाणे नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्पही शंभर टक्के क्षमतेने भरला आहे. नळदुर्ग परिसरात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असताना कुरनूर मध्यम प्रकल्पावरती अवलंबून असणाऱ्या विविध गावांतील शेतकरी बांधवांनी रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची गरज ध्यानात घेऊन शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे रब्बी आवर्तन सुरू केले आहे. कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांतील शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. वरील दहा गावांतील ३ हजार ६४३ हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी असल्याने पूर्णक्षमतेने आवर्तन पूर्ण होण्यास विलंब होत होता.
दुरुस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळतीही लागलेली आहे. त्यामुळे पाणी वितरणात अडथळे येत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत होता. त्यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे. कुरनूर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील दहा गावांतील शेतीसाठी प्रकल्पातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा, सिंचन क्षेत्रामध्ये झालेली घट दूर व्हावी आणि सिंचन क्षेत्र वाढावे, याकरिता वितरण व्यवस्थेच्या अस्तरीकरण आणि त्यावरील बांधकाम दुरुस्तीसाठी महायुती सरकारकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला.
हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. प्रकल्पाच्या दुरुस्ती कामास सुरुवातही करण्यात आली आहे. चालू रब्बी हंगामात पिकांना पाणी देत असताना प्रकल्पाच्या दुरुस्तीचे आव्हानात्मक काम करण्याचे ठरवले.
जेणेकरून शेतकरी बांधवांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टळणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पावर आधारित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंद पाइपलाइन द्वारे पाणी देण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात दीडपट वाढ अपेक्षित असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.