

Unseasonal Rain Impact: सध्या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे केळी बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गारांच्या माराने घडांची गुणवत्ता घसण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर काही भागात झाडं पूर्णपणे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवकाळी पावसामध्ये केळी बागेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळीच उपाययोजना करुन शेतकरी आपल्या बागेचे उत्पादन वाचवू शकतात.
अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे केळी पिकाची पाने फाटतात. काही वेळेस झाडं वाकतात, कोलमडून पडतात. याशिवाय केळीच्या घडांची गुणवत्ता ढासाळण्याची शक्यता वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी झाडांना आधार देणे, घडांना बंच कव्हर लावणे, पाणी आणि खताचे नियोजन, आणि रोगांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यासाठी जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. अंजली मेंढे आणि डॉ. व्हि. टी. गुजर यांनी माहिती दिली आहे.
झाडांना आधार
शेतकऱ्यांनी नेहमी हवामानाचा अंदाज घ्यावा. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आल्यास आधीच केळीच्या झाडांना बांबूने आधार द्यावा. त्यामुळे झाडं कोलमडणे आणि उन्मळून पडण्याच्या घटना कमी घडतात.
वाऱ्यापासून बचाव
याशिवाय वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी हिरवे शेडनेटचे कुंपण करणे फायदेशीर ठरु शकते. याशिवाय केळी बागा लावतानाच सजीव कुंपण लावावे. यामध्ये शेवरीच्या झाडांची शिफारस केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ करतात.
घडांचे संरक्षण
केळीच्या घडांच्या संरक्षणासाठी त्यांना बंच कव्हर लावावे. पॉलीप्रोपीलीन पासून बसलेले कव्हर केळीच्या घडांचे पाऊस, गारा तसेच कीड रोगांपासून संरक्षण करते.
पाण्याचे नियोजन
अवकाळी पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करुन घ्यावा. पिकाच्या उत्तम वाढीसाठी माती नेहमी वाफसा स्थितीमध्ये असणे गरजेचे आहे. मोठ्या आणि घड वाढीच्या अवस्थेत असलेल्या झाडाला २० ते २५ लिटर पाणी प्रति झाड देणे आवश्यक आहे.
खत व्यवस्थापन
केळी बागेला नेहमी संतुलित प्रमाणात खते द्यावीत. नत्र खताचे प्रमाण जास्त झाल्यास झाडाची शाकीय वाढ भरपूर होते आणि वारा पावसामुळे हे झाडं कोलमडते किंवा थेट उन्मळून पडते. त्यामुळे खतांचे योग्य नियोजन करावे. शक्यतो मातीची तपासणी करुन तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतं द्यावीत.
रोगांचे व्यवस्थापन
पावसानंतर केळीच्या झाडांवर स्टेम पिटिंग रोगाचे आक्रमण होते. हा रोग पायरिक्युलारिया अँग्युलाटा या बुरशीमुळे होतो. ज्यामुळे बागेचे मोठे नुकसान होऊ शकते. या रोगात पानांवर आणि खोडावर काळे ठिपके पडतात आणि पाने कमकुवत होऊन वाळतात. यामुळे बागेमध्ये स्वच्छता ठेवा. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पीक पाने किंवा झाड काढून टाकावे आणि नष्ट करावे. याशिवाय मेटिराम अधिक पायराक्लोस्ट्रोबीन ६० डब्यूडीजी या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.