Pune News : वाढती लोकसंख्या, शहरी आणि औद्योगिकीकरणामुळे भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याचे पुनर्भरण आणि संचय होत नाही. पडलेल्या केवळ २ टक्के पाण्याचा संचय झाला तरी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. यासाठी शहरी आणि ग्रामिण भागात सजगता आणि साक्षरता होणे गरजेचे आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी काम करण्याची गरज आहे, असा सूर विविध तज्ज्ञांच्या चर्चेतून उमटला.
ज्ञानप्रबोधिनीमध्ये जलसंचय तज्ज्ञ उल्हास परांजपे यांच्या पुढाकाराने शनिवारी (ता. १४) आयोजित ‘भूजलाची खरोखरच आवश्यकता आहे का? ’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या वेळी जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार, ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकास विभागाचे सुभाष देशपांडे, जलसाक्षरता विभागाचे विवेक गिरिधारी, जल अभ्यासक गिरीश सांगळे, सतीश खाडे, नितीन पंडित, दीपक बुरकुले, सतीश निराशे, विराज राजगुरू, शैलजा देशपांडे आदी उपस्थित होते.
परांजपे म्हणाले,‘‘जलसंचयाच्या सजगता आणि साक्षरतेमुळे पावसाचे पाणी वाया जात आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडत असून, पडलेल्या पावसाचा केवळ २ टक्के संचय केला तर पिण्याच्या पाण्याची गरज भागेल.
कोकणात देखील अशीच परिस्थिती आहे. सर्वाधिक पाऊस पडून देखील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. हे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत जलसंचयाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.’’
खाडे म्हणाले,‘‘ पावसाचे मोजमाप करणे सदोष आहे. हवामान बदलांमुळे पावसाची अनियमितता वाढली आहे. कृषी विभागाद्वारे मंडलनिहाय पावसाची मोजणी केली जाते. मात्र आता पावसाचे प्रमाण एकेका किलोमीटरनुसार बदलत आहे.
एका ठिकाणी अतिवृष्टी होते तर त्याच्या शेजारच्या गावात ऊन असते. अशा परिस्थितीत ४० गावांतील पडलेला पाऊस कसा मोजणार, असा प्रश्न आहे. तसेच रासायनिक खतांच्या मोठ्या वापरामुळे मातीची पाणीधारण क्षमता कमी झाली आहे. यामुळे पडलेला पाऊस जमिनीत न मुरता निघून जातो. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे.’’
‘‘सध्याची पीक पद्धती ही बाजारपेठेनुसार ठरते. ही पीक पद्धती पाण्याच्या उपलब्धतेवर ठरणे गरजेचे आहे. यासाठी चळवळ होणे गरजेचे आहे. त्यातून पाण्याचा योग्य वापर होईल,’’ असे पंडित यांनी सांगितले. ‘‘रेनवॉटक हार्वेस्टिंग ही काळाची गरज असून, या माध्यमातून पाण्याची गरज भागविणे शक्य होणार आहे,’’ असे शैलजा देशपांडे म्हणाल्या.
भूपृष्ठीय, भूगर्भातील पाण्याचा समतोल वापर हवा’
भूपृष्ठीय आणि भूगर्भातील पाण्याचा सयुक्तिक आणि समतोल वापर होणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा पुर्नवापरावर भर देण्याची गरज आहे,’’ असे जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.