Pollution in Indrayani River : इंद्रायणी नदीतील प्रदूषण थांबेना!; नियंत्रणा करण्याऐवजी ग्रामपंचायतींवर खापर फोडण्यात महामंडळ व्यस्त

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे यंदा देखील प्रस्थान होणार आहे. हा सोहळा आठवड्यावर आला असून अद्याप इंद्रायणी फेसाळत आहे.
Pollution in Indrayani River
Pollution in Indrayani RiverAgrowon

Pune News : आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी श्री क्षेत्र आळंदी येथून निघणार आहे. हा सोहळा फक्त आठोवड्यावर येऊन ठेपला असतानाही इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची पातळी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महापालिका हद्दीसह शेजारील गावातील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने गेल्या महिनाभरापासून पाण्यावरचा फेस कायम आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय चांगलाच संतापला असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षावर टीका होत आहे.

आळंदीतून पालखी सोहळ्यांचे प्रस्थान होणार असून राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदीत येतात. त्यामुळे येथे विविध सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन राज्‍य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यापद्धतीने इतर कामांना वेग आला आहे. मात्र इंद्रायणी नदीपात्रात गेल्या काही महिन्यापासून प्रदूषित सांडपाण्याबरोबर रासायनिक पाणी सोडले जात आहे. पाण्यावर साबणासारखे फेसाचे तवंग तयार होत आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यांत येणाऱ्यांना स्नानासाठी शुद्ध पाणी मिळणार का? असा सवाल वारकऱ्यांकडून केला जात आहे. तर प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई का केली जात नाही? असाही सवाल केला जात आहे. तर जाणीवपूर्वक प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्‍याचा आरोप नागरिकांनी केली आहे.

Pollution in Indrayani River
Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे. नदीतील प्रदूषणाला नदीशेजारील ग्रामपंचायतींना जबाबदार ठरवण्याचे काम महामंडळाकडून सुरू आहे. याबाबत महामंडळाने, नदीशेजारील ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. कारवाई करण्याऐवजी फक्त सूचनांचा पाढा महामंडळाकडून वाचण्यात आला आहे. तसेच प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांना अभय देण्याचे काम महामंडळाने केले असून प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतींच्‍या माथ्यावर फोडले आहे. त्यामुळे सध्या नदीशेजारील ग्रामपंचायतींमध्ये देखील रोष वाढत आहे.

दरम्यान महिन्‍याभरापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नदीच्या प्रदुषणाबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्‍या होत्या. या तक्रारीनंतर मंडळाने पाहणी दौरा केला. तसेच कोणत्याही प्रकारचा फेस, जलपर्णी आढळून आली नसल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगत हात वर केले होते.

मात्र पुन्हा फेसाळणाऱ्या नदीवरून मंडळावर टीका झाल्यानंतर मंडळाने नदीची पाहणी केली. तसेच नदीतील पाण्याचा नमुना घेतला. तपासाअंती नदी पात्रालगत असणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे नदीचे प्रदुषण वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नदी लगतच्या अनेक ग्रामपंचायती सांडपाण्यावर प्रक्रिया करत नाहीत. त्या पाण्यासह केमिकल कंपन्‍यांचे पाणी थेट नदीत मिसळते. त्‍यामुळे जलपर्णीत वाढ होत असून पाण्याला फेस येत असल्याची माहिती महामंडळाने दिली.

Pollution in Indrayani River
Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’ला प्रदूषणाचा विळखा

अनेक ग्रामस्थ, सामाजिक संघटनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून आम्ही नदीतील पाण्याचा नमुना घेतला आहे. तर तपासाअंती घरगुती सांडपाण्यामुळेच नदीचे प्रदुषण होत असून जलपर्णीत वाढ होत असल्‍याचे स्‍पष्ट झाले. त्यामुळे ग्रामपंचायतींनी सांडपाणी नदीपात्रात सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कुदळवाडी येथील नाल्याच्या पाण्यावर प्रक्रिया करावी. ते पाणी नदीत सोडू नये अशा सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेला देखील देण्यात आल्या आहेत. याचबरोबर प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून उपाययोजना केल्या जात आहेत.

-व्ही. व्ही. किल्लेदार, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला आठवडा शिल्लक आहे. सोहळ्याबाबत आढावा बैठका प्रशासनाकडून घेतल्या जात आहेत. मात्र इंद्रायणीच्या पाण्याबाबत कोणीच गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली नाही. येत्या दोन दिवसात वारकरी आळंदीत येतील. त्यांना स्नानासाठी शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, ही देवस्थानची भूमिका आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यासाठी वडिवळे धरणातून पाणी तातडीने सोडावे.

- योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज

गेल्या काही वर्षापासून इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी येतात. मात्र सातत्याने सांडपाणी सोडल्याने पाण्याचा वास आणि जलपर्णी असे इंद्रायणीचे विदारक रूप पाहावं लागतं. त्यामुळे सरकारने आता तरी प्रदूषण रोखून नदीला शुद्ध पाणी वाहते ठेवण्यासाठी निर्णय घ्यावा.

- कृष्णा महाराज परेराव, कीर्तनकार, आळंदी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com