Village
VillageAgrowon

Rural Story : माझं माहेर आंबेठाण गाव गं

Indrajit Bhalerao : हे गीत गाणाऱ्या काकूंचं नाव आहे कांताबाई गणेशराव सामाले. त्या आता साठीच्या आहेत. परभणी जवळील धर्मापुरी या खेड्यात जन्मलेल्या आणि टाकळी कुंभकर्ण सासर असलेल्या कांताबाई एकेकाळी शेतकरी चळवळीत काम करीत होत्या.
Published on

इंद्रजीत भालेराव

हे गीत गाणाऱ्या काकूंचं नाव आहे कांताबाई गणेशराव सामाले. त्या आता साठीच्या आहेत. परभणी जवळील धर्मापुरी या खेड्यात जन्मलेल्या आणि टाकळी कुंभकर्ण सासर असलेल्या कांताबाई एकेकाळी शेतकरी चळवळीत काम करीत होत्या. कांताबाई आणि त्यांचे मालक गणेशराव सामाले हे दोघेही १९८४ साली परभणीत झालेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनापासून संघटनेशी जोडल्या गेले. तेव्हापासून ते संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात जात होते. आणि कांताबाई गाणी म्हणत होत्या. याला आता चाळीस वर्षे झालेली आहेत. पण चाळीस वर्षांपूर्वी म्हटलेली गाणी त्यांना अजूनही जशाला तशी पाठ आहेत.

त्यांचं शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालेलं आहे. तरी स्वतः गाणी लिहून, त्यांना चाली देऊन त्या स्वतःच ती गाणी गात होत्या. या गीताच्या कवी, गायक आणि संगीतकार त्या स्वतःच आहेत. या गाण्यात चांगल्या गाण्याची सगळी वैशिष्ट्य आहेत. यातले शब्द, यातल्या मात्रा आणि यातल्या कल्पना कशातही कांताबाई उण्या वाटत नाहीत. म्हणताना कुठेही शब्दांची ओढाताण केल्यासारखे वाटत नाही. नेमक्या ठिकाणी, नेमके शब्द, नेमकी यमके आणि नेमक्या मात्रा जुळवलेल्या दिसतात.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या सहा महिन्यापूर्वी परभणीतल्या आमच्या एकनाथ नगरमध्ये त्या राहायला आल्या. त्यांचा मुलगा कलाशिक्षक आहे आणि त्यांचे जावई परभणीत शिक्षणाधिकारी आहेत. आमच्या घरासमोरच त्यांच्या मुलाने घर बांधलय. तिथं ते आता राहायला आलेले आहेत. आता ते आमचे कायमचे शेजारी आहेत. इतका चांगला शेजार कुणाला नको वाटेल ?

Village
Paddy Crop Damage : भातपिकाचे रानडुकरांकडून नुकसान

माझं घर इथं आहे असं समजल्यावर हे दोघेही पती-पत्नी आवर्जून मला एकदा भेटायला आले. त्यानंतर अधूनमधून येत राहिले. आमच्या गयाबाईच्या त्या आता खास मैत्रीण झालेल्या आहेत. कांताबाई संघटनेच्या सुरुवातीच्या काळात आंदोलनात गाणी म्हणत होत्या असं त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं. त्यावर त्यांना मी एखादं गाणं गाण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी मला हे गाणं ऐकवलं.

तो संघटनेचा सुरुवातीचा काळ होता. सगळा महाराष्ट्रच पेटून उठलेला होता. शेतकरी रयत शरद जोशींच्या पाठीमागं एकजीवानं उभी होती. जातीयतेचं विष तेव्हा समाजजीवनात आजच्याइतकं भिनलेलं नव्हतं. त्या काळातलं हे चित्र. शरद जोशींचे आंबेठाण हे गाव, हेच आपलं माहेर असं तेंव्हा शेतकरी बायांना वाटायचं. त्या माहेराला आपण एकदा जाऊन यावं असंही त्यांना वाटायचं. तेच या गाण्यातून कांताबाईंनी सांगितलेलं आहे. वयाच्या साठीतही त्यांचा आवाज अजून खणखणीत आहे.

Village
Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्यात सुधारित पैसेवारी पन्नास पैशांखाली

त्यांना कविता लिहिण्याचं, गाणी म्हणण्याचं, चाली लावण्याचं कुठलंही शिक्षण नाही. त्या केवळ चौथी शिकलेल्या आहेत. पण चळवळीची गरज म्हणून या माऊलीने ते सगळं ऐकून, पाहून आत्मसात केलं आणि चळवळीसाठी अशी कितीतरी गाणी लिहिली. आणि माइकसमोर उभं राहून खड्या आवाजात म्हटली देखील. ही गाणी म्हणून चळवळीत हवा भरण्याचं काम कांताबाईंनी एकेकाळी केलेलं आहे.

आज वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांची तब्येत ठणठणीत आहे. उत्साह तेवढाच आहे, जेवढा चाळीस वर्षांपूर्वी होता. या वयातही गणेशरावांचं आणि त्यांचं एकजीवानं राहणं मला मोठं कौतुकाचं वाटतं. माणसांमध्ये जिद्द असली, मेहनत करण्याची तयारी असली की माणूस म्हातारा होत नाही हे या दोघांकडे पाहून पटत जातं. गणेशराव बरेच दिवस टाकळी कुंभकर्ण या गावचे पोलीस पाटील होते. होमगार्डचे तालुकाप्रमुखही होते. चळवळीतल्या आणि या कामामुळे ते सजग आणि चौकस झाले. म्हणून त्यांच्या मुलांचे भवितव्यही त्यांना छान घडवता आलं. नाही तर बऱ्याचदा चळवळीतल्या लोकांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असते. म्हणूनच मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या वाटल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com