
Ajit pawar On Karjmafi : विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वादा केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता मात्र शेतकरी कर्जमाफीवरून हात झटकले आहेत. 'मी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं का", असं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी शुक्रवारी (ता.२) कर्जमाफीला बगल दिली आहे.
कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात अजित पवारांना कर्जमाफीवरून माध्यमांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. परंतु कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं? मी दिलं होतं का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी माध्यमांना केला. परंतु ६ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसने 'महाराष्ट्रवादी घोषणापत्र' या नावाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अजित पवारांना घोषणापत्राचा विसर पडला का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
महायुती सरकारच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपुर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रचारसभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तर महायुतीच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत. परंतु अजित पवारांनी पुन्हा एकदा कर्जमाफीला नकार दर्शवत कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं, असा घुमजावही केला आहे.
राज्यात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने कर्जमाफीवरून रान तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारवर टिकास्त्र सोडले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर गुरुवारी जोरदार टिका केली. कर्जमाफी देणं होत नव्हती, तर मग आश्वासन का दिलं, असा सवाल शेट्टी यांनी राज्य सरकारला केला.
राजू शेट्टी म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासन दिलं. त्यामुळे राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेलं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पाळून शेतकरी कर्जमाफी तातडीने करावी," अशी मागणीही शेट्टी यांनी केली.
यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड येथील सभेतही शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन 'आपण दिल्याचं ऐकलं का', असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांना केला होता. तसेच शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावीत, असं सांगून कर्जमाफी होणार नसल्याचे संकेत मार्च महिन्यात माळेगाव साखर कारखान्यावर बोलताना अजित पवारांनी दिले होते. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची चर्चा रंगली होती. त्यात आता अजित पवारांनी कर्जमाफीवरून हात झटकल्याने शेतकरी मात्र संताप व्यक्त करू लागले आहेत.
महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडणुकीत महायुतीला साथ दिली. परंतु सत्ता स्थापनेनंतर महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवरील संदिग्ध भूमिकेनं शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. आता तर कर्जमाफीची घोषणा केली, त्यांनाच विचारा अशी गोलमोल भूमिका घेऊन कर्जमाफीचा चेंडू मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.