
या देशामधील ६२ टक्के लोकसंख्या संपूर्णपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती आणि लोकसंख्येचा हाच मोठा हिस्सा बदलत्या वातावरणात तीन मुख्य संकटातून जात आहे. १) वाढती लोकसंख्या, २) नद्यांचे महापूर, अकस्मात होणारे पूर यामुळे काही क्षणात उभे पीक पूर्णपणे वाहून जाते. ३) वाढत्या समुद्र पातळीमुळे त्याचे भूप्रदेशावर आक्रमण वाढत असून जमिनीमध्ये क्षारता (salinity) मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
बांगलादेशाचा उत्तरपूर्व भाग तसा भात शेतीने समृद्ध आहे. मात्र काही वर्षांपासून नद्यांना अचानक पूर येऊन पिके वाहून जात आहेत. काही वर्षांपूर्वीच एक लाख एकेचाळीस हजार हेक्टर उभे पीक वाहून गेले, त्यामुळे ४ लाख तेवीस हजार शेतकरी उद्ध्वस्त झाले.
या देशाचे ३० भौगोलिक भाग पडतात. प्रत्येक ठिकाणची माती, स्थानिक वातावरण पीक पद्धती वेगळी आहे म्हणूनच वातावरण बदल नियंत्रणाखाली प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रारूप तयार करणे शासनास कठीण होत आहे. परिणामी, खेड्याकडून शहराकडे असे अंतर्गत स्थलांतर वेगाने वाढत आहे. भात, गहू, मका, दाळवर्गीय पिके, बटाटा, रताळी, ज्यूट, अंबा, फणस अननस, केळी आणि ऊस ही येथील खरीप, रब्बीतील मुख्य पिके आहेत. खरिपात प्रामुख्याने भात उत्पादन होते. भात आणि मासे हे येथील लोकांचे मुख्य अन्न.
अंदाजे ७५ टक्के जमिनीवर भात पिकतो. त्यापैकी ६० टक्के सिंचनावर अवलंबून आहे. जागतिक क्रमवारीत लोकसंख्येत आठव्या तर भात उत्पादनात चौथ्या क्रमावर असलेल्या देशात आज या वाढत्या लोकसंख्येस पुरेल एवढा भात उत्पादित होत नाही. भाताचे उत्पादन कमी होण्यामागे मागील एक दशकात वाढलेले एक अंश तापमान आणि पारंपारिक भात शेतीत वाढत असलेली क्षारता या बाबी जबाबदार आहे.
त्यातच रासायनिक खते आणि कीडनाशकांचा भरपूर वापर होतो. या देशातील भात शेतीमध्ये सरासरी २० हजार टन कीटकनाशके वापरली जातात, त्याचा तात्पुरता फायदा दिसत असला तरी दीर्घकालीन नुकसानच अधिक होत आहे. एका अंदाजानुसार, २०३० पर्यंत भात उत्पादन दहा टक्के कमी होईल. कोणतीही आंतररराष्ट्रीय अन्नधान्याची मदत गव्हाच्या रूपात केली जाते. येथे गहू खाण्याचे प्रमाण वाढत आहे.
येथील शेतकरीही गव्हाचे उत्पादनही घेऊ लागले असले तरी लांबलेला पाऊस, पुढे गेलेली थंडी यांचा त्यावर नकारात्मक परिणाम होतो. येथे वर्षातून तीन वेळा भात पीक घेतले जाते. त्यातील हिवाळा आणि उन्हाळा पूर्णपणे भूगर्भातील सिंचनावरच अवलंबून आहे. विंधन विहिरी खोल गेल्यामुळे सिंचित पाण्यात आर्सेनिक आणि क्षारांचे प्रमाण वाढत आहे.
काही ठिकाणी गव्हास पोषक वातावरण असतानाही शेतकरी भूगर्भातील अधिक पाणी उपसून भात उत्पादन घेत आहेत. भाताबरोबरच प्रतिवर्षी दीड ते दोन दशलक्ष टन गहू आयात करावा लागतो. असे अनेक प्रश्न एकमेकात गुंतलेले आहेत. हवामान बदलाचे संकट, त्यातच वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्यांच्या अन्न सुरक्षेची तजवीज अशा कचाट्यात येथील शासन सापडले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.