
लातूर : लातूर कृषी विभागातील (Agriculture Department) हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव (Disease On Tur Crop) आढळून आला आहे. तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत काही महसूल मंडलांत अतिवष्टीमुळे (Heavy Rain) पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. यासोबतच अपेक्षेच्या तुलनेत कमी पेरणी झालेल्या खरीप ज्वारीलाही मोठा फटका बसला आहे.
लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांत तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून, सरासरी क्षेत्राच्या ७३ टक्के म्हणजे २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून, फक्त ३३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पीक सध्या पोटरी व कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरासरीच्या पुढे जाऊन पाऊस
लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून ऑक्टोबरपर्यंत ९३५.९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. सरासरीच्या ११६ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ११५ टक्के आहे. लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर १०० टक्के प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.
इतर पिकांची क्षेत्रनिहाय स्थिती
मूग ः लातूर विभागात मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हेक्टर असून, ५९५१३ हेक्टरवर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ६१ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.उडीद ः उडदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर असून, आतापर्यंत ७५६०० हेक्टरवर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ७६ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.
सोयाबीन ः सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून, १९ लाख ११ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी १२२ आहे. पीक सध्या शेंगा पक्वतेच्या व काही ठिकाणी काढणी अवस्थेत असून, ६० ते ६५ टक्के काढणीचे काम पूर्ण झाले आहे. विभागातील सर्व जिल्ह्यात बहुतांश महसूल मंडलांत अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.
कापूस ः कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर असून, आतापर्यंत ४ लाख २ हजार ६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८३ आहे. पीक सध्या बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पहिल्या वेचणीस सुरुवात झाली आहे.
तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विभागातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत काही महसूल मंडलांत अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.