Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Kokan Agriculture: कोकण विभागासाठी कृषी सल्ला, ज्यामध्ये खरीप हंगामासाठी भाजीपाल्याची रोपवाटिका, नारळ, काजू, आंबा आणि खरीप भात लागवडीसाठी विशेष मार्गदर्शन देण्यात आले आहे. पाण्याची उपलब्धता, रोग प्रतिबंध आणि योग्य खत व्यवस्थापनावर भर दिला आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Tips:

भाजीपाला

रोपवाटिका तयारी

पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी वांगी, मिरची, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्याकरिता रोपवाटिकेची कामे सुरू करावीत. जमिनीची नांगरणी करून ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.

वांगी, मिरची, टोमॅटो पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी मर रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. सातत्याने मर रोग येणाऱ्या शेतामध्ये पीक फेरपालट करावी. तसेच एकाच शेतामध्ये तीन वर्षांपर्यंत वांगी कुळातील पिके लावू नयेत.

नारळ

नवीन नारळ बाग लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातून अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

नारळ लागवडीसाठी ७.५ बाय ७.५ मी. अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. तयार केलेले खड्डे ३ ते ४ घमेली चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून घ्यावेत.

Agriculture
Crop Advisory: कृषी सल्ला

काजू

काजू नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी.

काजू लागवडीसाठी साधारण एप्रिल मे महिन्यात ७ x ७ मीटर किंवा ८ x ८ मीटर अंतरावर काढलेल्या खड्ड्यांत हेक्टरी १५५ ते २०० कलमे बसतात. या खड्ड्यांची लांबी, रुंदी, खोली ०.६x०.६x०.६ मीटर इतकी असावी.

तयार खड्ड्यात दीड ते दोन घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळावी.

काजू लागवड क्षेत्रातून अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

आंबा

आंबा फळांची काढणी राहिली असल्यास देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला पावसाचा अंदाज घेऊन लवकर काढणी पूर्ण करून घ्यावी.

आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याच्या शक्यता आहे. त्यासाठी बागेमध्ये गळून पडलेले आंबे गोळा करून नष्ट करावेत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाद्वारे शिफारशीत फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.

आंबा बागेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

आंबा काढणी पूर्ण झालेल्या बागेमध्ये झाडाचा विस्तार नियंत्रित करण्यासाठी तसेच नवीन पालवी लवकर मिळविण्याच्या दृष्टीने झाडाच्या गरजेनुसार आवश्यक छाटणी करावी. झाडावरील बांडगुळे व रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. बांडगुळे काढलेल्या तसेच छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.

आंबा फळांची काढणी झाल्यानंतर घन लागवड (५ बाय ५ मी. किंवा ६ बाय ४ मी.) आंबा बागांमध्ये नियमित छाटणी करावी. यामध्ये उंची कमी करणे, एकमेकांमध्ये घुसलेल्या फांद्यांची छाटणी तसेच वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या कामांचा अंतर्भाव करावा. घन लागवडीमध्ये कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के ठेवावी.

नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी. घन पद्धतीने लागवडीसाठी ५ बाय ५ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली सुपीक माती, तीन ते चार घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरून ठेवावे.c

Agriculture
Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

खरीप भात

रोपवाटिका पूर्वतयारी

रोपवाटिकेसाठी उंचवट्याची व पाण्याचा निचरा होणारी जागा निवडावी. जेणेकरून जोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान होणार नाही.

रोपवाटिका क्षेत्रामध्ये जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावीत. प्रति गुंठा क्षेत्रास १०० किलो शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी, तळाशी १२० सेंमी व पृष्ठभागी ९० सेंमी रुंदीचे व ८ ते १० सेंमी उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत.

खरीप भात पिकाच्या गरव्या जातींची पेरणी केली असल्यास रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

एक एकर क्षेत्रामध्ये पुनर्लागवडीसाठी चार गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी.

मागील वर्षीचे राखून ठेवलेले भात बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे असल्यास, बियाणास ३ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी १० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करून त्या भात बियाणे बुडवावे. चाळणीच्या साहाय्याने पाण्यावर तरंगणारे हलके बियाणे काढून घ्यावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी वेगळे काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुवून ४८ तास सावलीत वाळवावे.

साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रोहिणी नक्षत्रावर भाताच्या गरव्या जातींची धुळवाफ पेरणी केली जाते. परंतु या वर्षी वेळे अगोदरच मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे धुळवाफ पेरणीकरिता योग्य परिस्थिती नाही. शिवाय पावसामुळे मातीचे तापमान कमी झाले आहे. याचा पेरणीनंतर भात बियांच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी भाताची पेरणी रहू पद्धतीने करण्याकरिता बियाणे २४ तास पाण्यात भिजवून नंतर ३६ ते ४८ तास गोणपाटाच्या पोत्यात ठेवून त्यास मोड आणावेत. मोड आलेले बियाणे पेरणीस वापरावे.

पेरणीकरिता वाफ्यावर रुंदीस समांतर १० सेंमी अंतरावर ओळीमध्ये साधारणतः २.५० सेंमी खोलीवर बी पेरून मातीआड करावे.

बियाणे प्रमाण (प्रति १० गुंठे क्षेत्र) :

जाड दाण्याच्या जातीकरीता : ५ ते ६ किलो.

बारीक दाण्याच्या जातीकरीता : ३.५० ते ४ किलो.

- डॉ. विजय मोरे (नोडल अधिकारी), ९४२२३७४००१ - डॉ. सुजित देशमुख (तांत्रिक अधिकारी) ८१४९४६७४०१,

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com