
Kokan Agriculture Tips:
काजू
परिपक्व काजू बी व बोंडाची वेचणी करून बी बोंडापासून वेगळे करून ते सुरक्षित ठिकाणी वाळवण्यासाठी ठेवावे.
दोन दिवसाआड परिपक्व काजू बी व बोंडाची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळे करावे. त्यानंतर काजू बी स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर उन्हामध्ये ३ दिवस वाळवावेत. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरीता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.
तीन दिवस वाळवणी झालेले काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावीत.
काजू बीची उगवणक्षमता तसेच गराची प्रत चांगली राखण्याकरीता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोलीमध्ये हवाबंद करून नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी.
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.
कलमाच्या जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.
सध्याच्या हवामान स्थितीत काजू पिकावर बोंड व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने फळधारणा झालेल्या काजू पिकामध्ये कोवळ्या बिया काळ्या पडून त्यांची गळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति कलम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने प्रति कलम १५ लिटर पाणी याप्रमाणे पाणी देण्याची व्यवस्था करावी. कलमाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
भाजीपाला पिके
तापमानात वाढ संभवत असल्याने भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.
भुईमूग
पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनंतर भर दिलेल्या भुईमुगाच्या पिकावरून रिकामे पिंप फिरवावेत. पिंप फिरवल्याने जमिनीत घुसणाऱ्या आऱ्यांची आणि शेंगांची संख्या वाढते. त्यामुळे भुईमुगाच्या उत्पादनात वाढ मिळण्यास मदत होते.
पीक फुलोरा अवस्थेत असताना पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
पशुधन सल्ला
जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर १ टक्का गुळपाणी आणि ०.५ टक्का मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे.
उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
गोठ्याच्या शेडचे छप्पर गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने गोठ्याच्या बाजूस पाण्यात भिजवलेले बारदान किंवा गोणपाट बांधावे.
जनावरांना सकाळी लवकर किंवा सायंकाळी चरायला घेऊन जावे. दुपारच्या वेळी भर उन्हात जनावरांना चरायला नेणे टाळावे.
माती परीक्षण
सर्वसाधारणपणे दर तीन ते चार वर्षांतून एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परिक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती होते. त्यानुसार अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे सोयीचे होते. खरीप पीक काढणीनंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये माती परीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु एकाच शेतातील जमिनीत वर्षातून दोन ते तीन वेळा पिके घेत असल्यास अशा जमिनीचे माती परीक्षण दरवर्षी करणे जरुरीचे आहे. हंगामी पिके भात, नागली, भुईमूग पिकांकरिता २० ते २५ सें.मी. आणि फळबाग पिके जसे की आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या करिता ६० सें.मी. खोलीवरचे मातीचे नमुने घ्यावेत.
डॉ. विजय मोरे (नोडल अधिकारी),
९४२२३७४००१, ८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.