
Konkan Agriculture:
नारळ
नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
नवीन नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे.
माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या सोंडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
आंबा : (सुपारी ते अंडाकृती फळे)
काढणीस तयार आंबा फळांची काढणी झेल्याच्या साहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करून घ्यावी.
आंबा काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत.
आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून आंबा वाहतूक करणे टाळावे.
कोरडे हवामान, तापमानात होणारी वाढ आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति कलम किंवा १५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात द्यावे. ही पाण्याची मात्रा फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावी.
आंबा कलमाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याच्या शक्यता आहे. बागेमध्ये गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे एकरी २ या प्रमाणात झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.
नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.
आंबा फळांचे फळमाशीपासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
डॉ. विजय मोरे (नोडल अधिकारी),
९४२२३७४००१, ८१४९४६७४०१
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.