
Indian Agriculture: काजू
फुलोरा ते फळधारणा अवस्था
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसाच्या अंतराने १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पालवीतील रस शोषत असल्याने नवीन पालवी सुकून जाते.
या किडीच्या नियंत्रणासाठी काजू मोहोर अवस्थेत असताना प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मि.लि. आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. करावी. कारण पुढे उन्हे तापू लागताच ढेकण्या सक्रिय होतात. ते एका जागी स्थिर राहत नसल्याने फवारणी द्रावणाचा संपर्क जास्त येत नाही. त्यामुळे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही.
(टीप : काजू बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेऊ नये. काजू बागेतील कलमांसोबतच इतर स्थानिक झाडांवर देखील फवारणी करावी. त्यामुळे या किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होईल.)
सध्याच्या हवामान स्थितीत काजू पिकावर बोंड व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस १५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने फळधारणा झालेल्या कलमांस पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति कलम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
वाल
फुलोरा ते शेंगा अवस्था
तापमानात वाढ संभवत आहे. वाल पिकाची फुलोरा ते दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील असते. या अवस्थेत वाल पिकास पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाल पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी व घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला कोवळ्या कळ्यांवर दिसून येतो. त्यानंतर कीड शेंगामध्ये शिरून कोवळ्या दाण्यांवर उपजीविका करते. प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंगा काढून टाकाव्यात.
फवारणी : (प्रति १० लिटर पाणी)
निंबोळी ५ टक्के अर्क किंवा
डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) २० मिलि या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
शेतामध्ये पक्षी थांबे उभारावे.
(टीप :ओल्या शेंगांची काढणी करावयाची असल्यास कीटकनाशकाची फवारणी घेवू नये.)
नारळ
तापमानात होणारी वाढ यामुळे नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषून घेतात. पानांवर रुगोज चक्राकार माशीचे पांढरे मेणचट तंतू दिसून येतात. तसेच माशी गोड चिकट स्त्राव सोडत असल्याने त्यावर बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडलेली दिसतात. किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे नियमित निरीक्षण करावे. किडीच्या व्यवस्थापनासाठी माडावर नीम तेल (०.५ टक्के) ५० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने प्रेशर पंपाच्या साहाय्याने पाण्याच्या तीन फवारण्या कराव्यात. यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन किडींचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होण्यास मदत होते.
नारळाच्या पाच वर्षावरील प्रति माडास निंबोळी पेंड ५ किलो, युरिया ७५० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश ६६७ ग्रॅम या खताची तिसरी मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. ही खताची मात्रा पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट द्यावीत. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्ये २०० ग्रॅम प्रति माड याप्रमाणे वर्षातून एकदा शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताच्या मात्रेसोबत द्यावी. यामध्ये झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम व कॉपर यांचा समवेश करावा. खते दिल्यानंतर लगेच माडाला पाणी द्यावे.
चवळी
फुलोरा ते शेंगा अवस्था
चवळी पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. मावा किडीचे प्रौढ आणि पिल्ले कोवळ्या शेंड्यावर पानाच्या खालील भागातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. रसशोषण करताना कीड मधासारखा चिकट द्रव स्रवते. त्यामुळे पानांवर काळ्या बुरशीची वाढ दिसून येते. माव्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी
डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १२ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तापमानात वाढ संभवत आहे. चवळी पिकाची फुलोरा ते दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील आहे. या अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी.
भुईमूग
भुईमूग पिकामध्ये लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आवश्यकतेनुसार खुरपणी करून पिकास मातीची भर द्यावी. त्यानंतर १५ दिवसांनी भर दिलेल्या भुईमुगाच्या पिकावरून रिकामे पिंप फिरवावे. जेणेकरून जमिनीत घुसणाऱ्या आऱ्यांची आणि शेंगाची संख्या वाढण्यास मदत होईल.
- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.