Pune News : ‘‘साखर आयुक्त म्हणून मी काम केले. साखर कारखान्यात ऊस टाकला की साखर बाहेर पडते हे मला उमगले. परंतु कृषी खात्यात प्रपत्रांचे इतके जंजाळ आहे, की त्यातून गोळा होणाऱ्या भरमसाट माहितीचे पुढे काय होते, हे मला कधीही कळाले नाही. कृषी विभाग प्रशासकीय जंजाळात अडकल्यामुळे शेतकऱ्यांच्या सेवेला उपलब्ध होत नाही,’’ असे रोखठोक उद्गार ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी काढले.
राज्याचे कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांच्या निवृत्ती निमित्ताने कृषी आयुक्तालयात आयोजित केलेला सेवापूर्ती सोहळा रंगतदार ठरला. या वेळी माजी अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते व आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, की कृषी विभागाच्या तांत्रिक बाजू व शेतकरी हिताच्या बाजू वरिष्ठांसमोर श्री. झेंडे यांनी निर्भीडपणे मांडल्या. कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे म्हणाले, की शेतकरी कुटुंबात राहून श्री. झेंडे यांनी लोकसेवा आयोगाच्या कृषिसेवा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
त्यांचा संचालकापर्यंत झालेला प्रवास सर्वांसाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे म्हणाले, की पुरंदर भागातून श्री. झेंडे कृषी खात्यात आले. परंतु ते या भागाला विसरले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांनी सतत मार्गदर्शन करीत समृद्ध केले.
‘‘तीन दशकांहून अधिक कृषी सेवेत मी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानले. भूकंप, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कोरोना अशा कठीण काळात मी नियोजन करीत राहिलो. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांसाठी प्रभावी काम केल्याचे समाधान मला आहे,’’ असे श्री. झेंडे म्हणाले. शेतकऱ्यांच्यावतीने सागर काळे व मोहन झेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.