Jalna News : हवामानाच्या प्रतिकूलतेत त्याला अनुकूल शेती पद्धतीचा स्वीकार करावा लागेल. नव तंत्रज्ञानाचाही स्वीकार आवश्यक आहे. शेतीतील श्रमाला शास्त्राची व आवश्यक तंत्रज्ञानाची जोड दिली तर कोणत्याही पिकातून समृद्धी साधने शक्य होते, असे मत खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी व्यक्त केले.
‘सकाळ ॲग्रोवन’ व रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव (ता. परतूर) येथे शुक्रवारी (ता. १७) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात श्री. मिटकरी बोलत होते.
या ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाला रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणाळे, कंपनीचे उत्तर मध्य महाराष्ट्र व्यवस्थापक शशिकांत राठोड, माजी सरपंच दादाराव खोसे, बाजीराव खरात, जय ॲग्रो ट्रेडर्सचे रामेश्वर तापडिया आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले.
श्री. मिटकरी म्हणाले, की कपाशीच्या आजवरच्या प्रवासात तंत्रज्ञानाचे चार टप्पे आपण स्वीकारले. सुरुवातीला देशी वाण, नंतर सरळ, नंतर संकरित व आता बीटी अशा वाहनांचा स्वीकार आपण केला. हे जनुकीय बदलाचे तंत्रज्ञान स्वीकारण्यापूर्वी आपल्या कपाशी पिकाची रुईची उत्पादकता २०० ते २५० किलो प्रति हेक्टर होती. कपाशीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे देश म्हणून चीन आणि ब्राझीलकडे पाहिले जाते.
कुठल्याही पिकांच्या अपेक्षित उत्पादनासाठी ते पीक ज्या जमिनीत घेतले जाते त्यात जमिनीची सुपीकता महत्त्वाचे आहे. त्यासाठी सेंद्रिय खताचा वापर आवश्यक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही पिकांचे अवशेष न जाळता ते जमिनीत कुजतील अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावावी. जमिनीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी काम करावे लागेल. कपाशी लागवडीसाठी कमी कालावधीचे वाण निवडली जावी. पूर्वहंगामी लागवड करताना २५ मे ते एक जून दरम्यान लागवड करण्यास हरकत नसल्याचे ते म्हणाले.
श्री. लोणाळे म्हणाले, की रिवुलिस कंपनीचा विस्तार १२० देशात झाला आहे. जमिनीला जिवंत ठेवणारे जिवाणू जगले तरच खताची कार्यक्षमता वाढेल. कोणतही ठिबक सात वर्ष वापरला जावा. ठिबक संच वापरण्यापूर्वी जमिनीचे मोजमाप डिझाइन, आधी तपासून तज्ञांमार्फतच ते वापरात आणावे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲग्रोवनचे वितरण सह व्यवस्थापक अजित वाणी यांनी केले. यशस्वितेसाठी ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे यांच्यासह रिवुलिस इरिगेशनचे जिल्हा प्रतिनिधी हनुमान पडोळे, अनिल मातने यांनी प्रयत्न केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.