Pune News : ‘‘भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व पिकांच्या शास्त्रोक्त उत्पादन पद्धतीबाबत बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असणे, ही प्रचंड चिंतेची बाब आहे.
शेती तंत्रज्ञान व पिकाबाबत शेतकरी साक्षर असणे, ही काळाची खरी गरज असून त्यासाठी जनचळवळ उभारणे गरजेचे आहे,’’ असे मत प्रसिद्ध कांदा बीज संशोधक संदीप घोले यांनी व्यक्त केले.
करडे (ता. शिरूर) येथे दैनिक सकाळ-ॲग्रोवन व भैरवनाथ कृषी एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा पिकांबाबत शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
डिजिटल शेती कंपनीचे व्यवस्थापक विजय सांगळे, ॲग्रोवन पुणे ग्रामीण प्रतिनिधी गोकुळ कदम, माजी सरपंच अतुल बेंद्रे, सोमनाथ बेंद्रे, उपसरपंच संतोष घायतडक, स्वप्नील घायतडक, भास्कर वाळके, आबासाहेब घुंबरे, यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
घोले म्हणाले, ‘‘शास्रीय पद्धतीने शेती करताना माती परीक्षण, सेंद्रिय कर्ब, पाणी व खतांचे व्यवस्थापन, औषध फवारणीचे नियोजन अत्यावश्यक असते. मात्र आपण आजही पारंपरिक शेती पद्धतीला प्राधान्य देत असल्याने उत्पादन व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळेच तोट्यात जाणारी शेती व्यवस्था आणि शेतकरी फायद्यात आणायची असेल तर शेती व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी साक्षर झालेच पाहिजे.’’
शेतकऱ्यांची शाळा, शेतीविषयी अज्ञान
माती परीक्षण करता का? पाण्याचा पी.एच. चेक करता का? बीजप्रक्रिया करता का? बेसल डोस टाकता का? पीकपद्धतीबाबत सखोल अभ्यास करता का? पिकांना बुरशी का लागते, आदी शेती संबंधित महत्त्वाचे प्रश्न संदीप घोले यांनी शेतकऱ्यांची शाळा घेत शेतकऱ्यांना विचारले. मात्र एखाद-दुसरा शेतकरी वगळता बहुतांशी शेतकऱ्यांना या प्रश्नांची उत्तरे आलीच नाही. यावरूनच ग्रामीण भागातील शेतकरी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत किती अज्ञान आहे, हे स्पष्ट होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.