Summer : आव्हानात्मक उन्हाळा

Weather Update : उन्हाचा चटका जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणीही वाढेल. त्यामुळे जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याचा सर्वांनीच अत्यंत काटकसरीने वापर करायला हवा.
Summer
SummerAgrowon

Maharashtra Weather : राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून वादळी पाऊस कुठे ना कुठे हजेरी लावत आहे. अवकाळी पाऊस पडत असलेल्या भागांत तापमान तात्पुरते खालावत असले तरी पाऊस पडून गेल्यावर असह्य उकाडा लोकांना सहन करावा लागतोय. चार दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटकाही वाढत आहे. सकाळी थंड हवा आणि दुपारी कडक ऊन असे संमिश्र वातावरण राज्यात सध्या आहे.

त्यातच मार्च ते मे या उन्हाळी हंगामात महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत तीव्र उष्ण लाटा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील मॉन्सूनमधील कमी पाऊसमान आणि आता चढत असलेला उन्हाचा पारा यामुळे दुष्काळाच्या झळाही राज्यात वाढत आहेत.

अशा विपरीत वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावरही दिसून येतो. विषाणूजन्य ज्वरासह सर्दी-खोकल्याची साथ राज्यात सुरू आहे तर वाढत्या उकाड्याने प्रामुख्याने वयोवृद्धांमध्ये अस्वस्थतेचे प्रमाणही वाढत आहे. अशा प्रकारच्या हवामान परिस्थितीतून हंगामी पिकांची सुटका कशी होणार? मागील मॉन्सूनमधील कमी पाऊसमानामुळे खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे उत्पादन तर घटलेच आहे, त्याचबरोबर रब्बी, उन्हाळी हंगामांचे नियोजनही बिघडले आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगामातील पिकांचा पेरा घटला. त्यातच डिसेंबर-जानेवारीपासून राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने उन्हाळी पिकांची पेरणी तर सरासरीच्या ४० टक्के क्षेत्रावरच झाली आहे. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाराटंचाई निर्माण झाल्याने पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांचा कल चारा पिकांकडे दिसून येतो.

Summer
Summer Heat Update : राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

त्यामुळे उन्हाळी पिकांची पेरणी २० मार्चपर्यंत होणार असली तरी त्यातून उन्हाळी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढीच्या आशा आता माळवल्या आहेत. एकंदरीत ही सर्व परिस्थिती शेतकऱ्यांपासून ते शासनापर्यंत अशा सर्वांसाठी खूपच आव्हानात्मक म्हणावी लागेल.

कमी पाऊसमानामुळे बहुतांश नद्या-नाले-धरणे-तलाव कधीच कोरडे पडलेले आहेत. त्यात आता उन्हाचा चटका जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणीही वाढेल. त्यामुळे जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याचा सर्वांनीच अत्यंत काटकसरीने वापर करायला हवा. संभाव्य भीषण पाणीटंचाई बघता प्रशासनाने आत्तापासून उपाययोजना हाती घ्यायला हव्यात. आगामी तीन महिन्यांच्या गंभीर दुष्काळात ग्रामीण भागांत कुणालाही पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागणार नाही, ही दक्षता घेतली पाहिजे.

Summer
Weather Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल

तसेच शहरी भागांतही उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ते सोडण्यात यायला हवे. ग्रामीण तसेच शहरी नागरिकांनी पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही, हे पाहावे. पिण्याच्या पाण्यानंतर शेतीसाठी प्राधान्यक्रम हवा. परंतु मागील काही वर्षांपासून शेतीकडे दुर्लक्ष करून औद्योगिक क्षेत्राला पाणी कमी पडणार नाही, असे धोरण अवलंबण्यात येतेय, जे योग्य नाही.

पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना उन्हाळी हंगामी पिकांसह फळे-फुले-भाजीपाला पिकांची पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी सुद्धा उपलब्ध पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर झाला पाहिजे. पीक कोणतेही असो पाटाने पाणी देण्याऐवजी सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचा वापर मोजून मापूनच झाला पाहिजेत.

शिवाय शेतात आच्छादनांचा वापर करून पाण्याची गरज कमी करता येईल. दुष्काळामुळे कोणत्याही फळबागेवर कुऱ्हाड चालवली जाणार नाही, हेही पाहायला हवे. दुष्काळात शेतीनंतर फटका बसतो तो पशुधनाला! आगामी चार-पाच महिन्यांत (पाऊस पडून चारा उपलब्ध होईपर्यंत) चाऱ्याचेही योग्य नियोजन करावे लागेल.

तसेच मागणीनुसार चारा डेपो, चारा छावण्या यांचीही तत्काळ सोय झाली पाहिजे. मागील काही वर्षांपासून उष्णतेच्या लाटेत उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण पण वाढले आहे. या उन्हाळ्यात एकाही नागरिकाचा उष्माघाताने जीव जाणार नाही, ही काळजी देखील घेतली पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com