
Nagpur News : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या संचालकांच्या निवडी संदर्भातील घडामोडींना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पातळीवर वेग आला आहे. संचालक पदासाठी झालेल्या मुलाखत प्रक्रियेत ११ उमेदवारांपैकी ९ जण सहभागी झाले होते.
भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत नागपुरात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. कापूस उत्पादकांना नवे वाण, तंत्रज्ञान तसेच लागवड पद्धतीची शिफारस करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होते. सध्या देशात सुमारे १३० लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्या माध्यमातून २९९ ते ३०० लाख गाठींची उत्पादकता मिळते. मात्र जागतिक स्तरावर लागवड क्षेत्र अधिक असताना तुलनेत उत्पादकता कमी आहे.
त्यामुळेच केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उत्पादकता वाढीच्या टप्प्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कापूस उत्पादकांची आहे. दरम्यान, देशात लागवड क्षेत्राच्या माध्यमातून कापूस हे मुख्य पीक ठरते. या पिकात संशोधनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ मार्च रोजी संपणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर नव्या संचालकाच्या निवडीला गती आली आहे. त्याकरिता फेब्रुवारी महिन्यात जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर आता मुलाखती देखील पार पडल्या. परंतु केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे त्यांच्या मुलाच्या लग्नात व्यस्त आहेत. ते परतल्यावर संचालकाच्या नावावर चर्चा होत एक नाव अंतिम होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
तूर्तास मुलाखत दिलेल्या उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. दरम्यान, २९ ते ३१ मार्च या कालावधीत शासकीय सुट्ट्या असल्याने डॉ. प्रसाद यांच्यासाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २८) आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी नव्या संचालकांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्यासह ‘सीआयसीआर’ तज्ज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांनी देखील संचालक पदासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांच्यासह तब्बल दहा जणांना कॉल पाठविण्यात आला नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र डॉ. खर्चे यांना यापूर्वी कृषी संशोधन परिषदेच्या उपमहासंचालक (नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट) पदासाठी मुलाखतीची संधी मिळाली होती, हे विशेष.
२१ पैकी ११ जणांना मुलाखत पत्रे
महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, हरियाना या राज्यातील तज्ज्ञांनी संचालक पदासाठी अर्ज केला होता. तब्बल २१ जणांनी अर्ज केला असला, तरी त्यातील ११ उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यांना मुलाखतपत्रही मिळाले. मात्र अकरापैकी ९ जणांनीच मुलाखत दिली. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथील डॉ. पवन कुलवाल यांच्यासह कापूस संशोधन संस्थेचे डॉ. गणेश बेहरे, डॉ. विजय वाघमारे, डॉ. ब्लेझ डिसूझा, डॉ. सतीशकुमार सेन यांच्यासह चार जणांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.