
Kolhapur News : केंद्र सरकारने शनिवारी अधिसूचना काढून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. या वेळी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
पक्ष नेते संजय पाटील म्हणाले, की आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीवर कर आकारला जात नव्हता पण केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्याला केंद्राच्या निर्णयामुळे चांगल्या भावाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना रडवणार आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांचे हित जपताना केंद्राला शेतकऱ्यांचा विसर पडला असून शेतकरीहित विरोधी अधिसूचना केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी. अन्यथा राज्यभर केंद्र सरकार विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल.
केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून कोरोनातून नुकत्याच सावरलेल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळणार होते पण तेसुद्धा केंद्राने हिरावून घेतले. गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. असा उद्ध्वस्त करणारा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
या आंदोलनात जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु, संग्राम जाधव, विक्रम जरग, भीमराव पाटील, बाबूराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सतीश मोटे, प्रकाश पाटील, तानाजी मोरे, रोहित जाधव, संदीप वाडकर आदी सहभागी झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.