
Pen News : पेण तालुक्यातील वाशी व शिर्की खारेपाटातील ५२ गावांपैकी १९ गावांना हेटवणेचे पाणी मिळाले आहे; मात्र उर्वरित ३३ गावे २५ वर्षांपासून बागायतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वर्षात तरी खारेपाटातील पाणीसंकट दूर होईल का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत दोन वेळा उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने खारेपाटातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ७६६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे नव्या सरकारने हेटवणे कालवा विभागाकडून लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
खारेपाटाच्या ५२ गावांतील ६,६६८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणून जिरायती शेतीचे रूपांतर बागायतीत करण्याचे सरकारचा उद्देश आहे, मात्र त्या दृष्टीने अद्याप हालचाली होताना दिसत नाहीत. पेण तालुक्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागतात. मेपर्यंत टंचाईने शिखर गाठलेले असते.
हेटवणे, शहाबाजसारखी धरणे पेण तालुक्यात असूनही परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हेटवणेतील पाणी नवी मुंबईला दिले जाऊ शकते; पण शेतकरी मात्र वर्षानुवर्षे सिंचनापासून वंचित असल्याने संताप व्यक्त होत आहे.
हेटवणे हा मध्यम प्रकल्प आहे. सध्या धरणाची एकूण पाणी पातळी ८३ मीटर इतकी आहे. सिंचनासाठी पाणी आरक्षित करून ठेवले आहे. ८८ दक्षलक्ष घनमीटर सिंचनाचे पाणी शेतीसाठी आरक्षित आहे. ते आता ३० दशलक्ष घनमीटरवर आले आहे.
आठ महिन्यांपूर्वी खारेपाटातील शेतकऱ्यांनी सात दिवस उपोषण केले होते. अधिवेशनातही हा विषय मांडण्यात आला होता. यावर सरकारने ७६८ कोटींच्या प्रशासकीय मान्यता असलेले पत्र नीलम गोऱ्हे व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आंदोलकांना दिले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.