
Nanded News : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या ३२९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. यात सर्वाधिक खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांसह ‘महाबीज’चे बियाणेही उगवले नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे कृषी विभागाने कृषी शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठविण्याचे काम सुरू केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांचे काम अंतिम टप्प्यांत आले आहे. जिल्ह्यात यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यासोबतच कपाशीची लागवडही यंदा वाढली आहे. परंतु पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
यात खासगी कंपन्यांसह शासनाने अनुदानावर शेतकऱ्यांना दिलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचाही समावेश आहे. का जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी देगलूर तालुक्यातून १६५ प्राप्त झाल्या आहेत. तर हिमायतनगर ८५, कंधार १९, बिलोली १८, मुखेड १३, धर्माबाद ११, माहूर सहा, किनवट, उमरी, अर्धापूर प्रत्येकी तीन, नांदेड दोन व लोहा एक अशा ३२९ प्राप्त तक्रारींचा समावेश आहे.
शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे अर्ज दाखल झाल्यानंतर कृषी विभागाच्या उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, तालुका स्तरावरील गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांच्या शेतीवर भेटी देऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणी अहवालातून निघालेल्या निष्कर्षानुसार संबंधित बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
देळूबच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
अर्धापूर तालुक्यातील देळूब येथील शेतकरी बालाजी हेंद्रे यांनी त्यांच्या शेतात पेरणी केलेल्या इनोवेज १०८ या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. परंतु हे बियाणे उगवले नसल्याची तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर देळूब येथीलच चिमाबाई थोरात या महिलेने ईगल कंपनीचे पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचे तक्रारी म्हटले आहे.
खासगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या तक्रारी अधिक
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या आहेत. यात सर्वाधिक ईगल सीड्स, परम सीड्स, इेनोव्हेज १०८, उत्तम, सारस, एशियन, दिव्यरत्न या कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. हिमायतनगर भागात ईगल तर देगलूर भागात परम या कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.