
Kolhapur News : यंदाचा ऊसतोडणीचा भार पहिल्यांदाच ऊसतोडणी यंत्रावर आला आहे. राज्यात एकूण ऊस क्षेत्राच्या सुमारे तीस टक्के ऊसतोडणी यंत्राने होत असून ऊस क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात तर हे प्रमाण ४० टक्यांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांशी साखर कारखान्यांनी यंत्राला प्राधान्य दिले आहे.
ज्या ठिकाणी सपाट व जास्त क्षेत्र असणारे ऊस क्षेत्र आहे त्या ठिकाणी प्राधान्याने यंत्राने ऊस तोडणीला पसंती दिली जात आहे. अनेक कारखान्यांनी गळीताची क्षमता वाढविली आहे जर क्षमतेनुसार गाळप करायचे झाल्यास तोडणी यंत्राशिवाय पर्याय नसल्याने आम्ही यंत्रानेच ऊस तोडणीला गती दिली असल्याचे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी होत आहे. निवडणुकीमुळे उशिरा हंगाम सुरू झाल्याने गेलेला वेळ भरुन काढण्यासाठी कारखान्यांनी ऊस तोडणी मजुरांपेक्षा यंत्रेच पाठविली. एका दिवसातच दीडशे ते दोनशे टन उसाची तोडणी होत असल्याने तोडणीची गती वाढली. यामुळेच ऊस पट्ट्यामध्ये यंत्राने तोडणी केलेल्या उसाची वाहनेच अधिक प्रमाणात दिसत आहेत.
कोल्हापूर सारख्या उसाच्या अग्रगण्य जिल्ह्यातही यंदा पहिल्यांदाच सुमारे दोनशेहून अधिक यंत्रे उसाची तोड करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांकडे यंदा पहिल्यांदाच १० ते ७० यंत्रे तोडणीसाठी उपलब्ध आहेत. मराठवाड्यामध्येही अनेक कारखान्यांनी यंत्राने ऊसतोडणीचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढविले आहे.
यंदा उशिरा गाळप सुरू झाल्याने ऊसतोडणी वेळेत होणार नाही असा अंदाज होता, पण यंत्राच्या तोडणीने हा दुरावा भरुन यंदा ऊस शिल्लक राहण्याची समस्या उरकण्याची शक्यता सध्या तरी नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडूनही पसंती
उसाची तातडीने तोड झाल्याने शेतकऱ्यांनाही पुढील पिकांसाठी तातडीने रान मोकळे होते. यामुळे शेतकरीच ऊस तोडणी यंत्राला प्राधान्य देत आहेत. यंत्रामुळे उसाचा चारा मिळत नसल्याने चारा मिळत नसला तरी चाऱ्यापेक्षा ऊसतोडणी महत्त्वाची मानून ऊस तोडणी होत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
खुशाली सक्तीने वसूल
मराठवाड्यातील काही कारखाने संपूर्ण ऊसच यंत्राद्वारे तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यंत्राने ऊसतोडणी सुरू असली तरी खुशाली सक्तीने वसूल करण्याचे काम तोडणी यंत्रणांकडून सुरूच आहे. अनेक कारखान्यांनी असे प्रकार घडल्यास कारवाईचा इशारा दिला असला तरी सध्या तरी हा इशारा कागदावरच असल्याचे उत्पादकांनी सांगितले.
कारखान्यांनी दाखविला यंत्रांवर विश्वास
मजुरांचे करार करुन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पोबारा करणाऱ्या काही व्यक्तींमुळे अनेक कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसतो. पैसे जातातच पण ऐनवेळी मजूर न आल्याने तोडणीचे नियोजन फिस्कटते. हा पूर्वानुभव लक्षात घेता यंदा मातब्बर कारखान्यांबरोबर छोट्या कारखान्यांनीही यंत्रावर विश्वास दाखवला आहे. अडचणीतल्या उसाचीच तोड केवळ मजुरांमार्फत सुरू असल्याचे चित्र बहुतांशी ऊस पट्ट्यात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.